गजेंद्र शर्मा यांनी १९८२ मध्ये जेव्हा घर सोडलं होतं तेव्हा त्यांचं वय ४० वर्ष होतं. त्यांचं लग्न झालेलं होतं. त्यांना दोन मुलंही होती. ३६ वर्ष पाकिस्तानी जेलमध्ये घालवल्यानंतर गजेंद्र शर्मा पुन्हा आपल्या घरी जयपूरला परतणार आहेत. ३६ वर्षानंतर सर्व काही बदललं असून यावेळी त्यांची सहा नातवंडं त्यांची वाट पाहत असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजेंद्र शर्मा जयपूरमध्ये मजुरीचं काम करायचे. मे २०१८ मध्ये ते लाहोरमधील कोट लखपत कारागृहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांची १३ ऑगस्टला सुटका केली जाणार आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी कुटुंबाला त्यांच्या सुटकेची माहिती दिली.

शर्मा यांची पत्नी मखनी देवी आणि मोठा मुलगा मुकेश यांनी दिल्लीत जाऊन व्ही के सिंग यांची भेट घेतली. ‘१३ ऑगस्टला माझ्या वडिलांची सुटका होईल असं सांगण्यात आलं. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी ते उपस्थित असावेत अशी आम्ही प्रार्थना करत आहोत’, असं मुकेश यांनी सांगितलं आहे.

गजेंद्र शर्मा घऱी परतल्यानंतर मोठं सेलिब्रेशन करत संपुर्ण गावासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्याचा बेत कुटुंबाने आखला आहे. जयपूरचे खासदार रामचरन बोहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वृत्तपत्रांमधून आम्हाला ते पाकिस्तानमधील कारागृहात असल्याचं समजलं. पण त्यांना कशासाठी अटक करण्यात आली होती हे समजू शकलं नाही. कुटुंबाने माझ्याकडे मदत मागितली. त्यांना दोन महिन्यांचीच शिक्षा झाली होती, पण वकील न मिळाल्याने त्यांना ३६ वर्ष कारागृहात घालवावी लागली’.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajendra sharma to return jaipur after 36 years in pakistan jail
First published on: 10-08-2018 at 09:14 IST