गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३५ जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान, दुर्घटनेत इतक्यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याचं नेमकं काय कारण आहे यावर राष्ट्रीय आपत्ती दलाच्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना नदीमधील पाण्याची पातळी कमी होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.
एनडीआरएफचे कमांडंट व्हीव्हीएन प्रसन्ना कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुलाच्या दोन्ही बाजूला पाण्याची पातळी फक्त १० फूट इतकी आहे. यामुळे खाली पडल्यानतंर लोक दगडावर आपटले. इतक्या उंचीवरुन खाली पडल्याने त्याची तीव्रताही जास्त होती”. नदीत पार पडलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये व्हीव्हीएन प्रसन्ना कुमारही सहभागी होते.
नदीच्या मधील भागात पाणी स्थिर असून २० फूट खोल आहे. तसंच पाणी गढूळ असून दृश्यमानता कमी आहे असंही त्यांनी सांगितलं. “मृतदेहांचा शोध घेण्यासाठी आम्ही कॅमेरा आणि सोनार उपकरण जोडण्यात आलेल्या अल्ट्रामॉडर्न रिमोट अंडरवॉटर वाहनाचा वापर करत आहोत,” असं ते म्हणाले.
“नदीच्या तळाला सगळीकडे दगड आहेत. यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असून, जखमी झाले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. वाहता प्रवाह नसल्याने मृतदेह वाहून गेले नाहीत. पुलाच्या खालीच सर्व मृतदेह सापडले असं कुमार यांनी सांगितलं.
नेमकं काय झालं?
रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही घटना घडली. या भागात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिलं नव्हतं, अशी माहिती मिळत आहे. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मदतीची घोषणा
मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.