गुजरातमधील हिम्मतनगर येथे राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्याने आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करून भिक्षूक होण्याचा निर्णय घेतला आहे. या दाम्पत्याने तब्बल २०० कोटींची संपत्ती दान करून जैन धर्मातील आध्यात्मिक मार्ग निवडला आहे. भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने फेब्रुवारी महिन्यात सर्व धनसंपत्तीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतरित्या सर्व भौतिक सुखांचा त्याग केला आहे.

विशेष म्हणजे भंडारी दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी २०२२ साली भिक्षूक होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या मुलांच्या पावलावर पाऊल टाकत आता भंडारी दाम्पत्यही सर्व त्यागून आध्यात्मिक मार्गावर चालू पडले आहे. भावेश भंडारी यांच्या समाजातील लोकांनी सांगितले की, भंडारी दाम्पत्याच्या मुलांनी भौतिक आसक्तीचा त्याग करून धार्मिक मार्गावर चालण्याची विनंती केल्यानंतर आई-वडिलांनी हे पाऊल उचलले.

२२ एप्रिल रोजी आता सन्यांशी होण्याची शपथ घेतल्यानंतर दाम्पत्याला आपले वैवाहिक संबंध सोडून सर्व भौतिक सुखांचा कायमचा त्याग करावा लागणार आहे. यापुढे ते भारतभर अनवाणी फिरतील आणि या काळात केवळ भिक्षेवर जगतील. भिक्षूक झाल्यानंतर दाम्पत्याला केवळ दोन पांढरी वस्त्रे, भिक्षेसाठी एक वाटी आणि ‘राजारोहण’ बाळगता येईल. जैन साधूकडे बसताना जमीन झाडण्यासाठी जो एक प्रकारचा झाडू असतो, त्याला राजारोहण म्हणतात. बसण्याच्या जागेवरील किटक बाजूला सारून बसण्यासाठी याचा वापर होतो. यातून अहिंसक मार्गाचा अवलंब केला जातो.

अफाट संपत्ती असूनही त्याचा सहजपणे त्याग केल्यामुळे भंडारी कुटुंब राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. भवरलाल जैन यांनीही याआधी कोट्यवधी संपत्तीचा त्याग करून धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता, त्याचीच री आता भंडारी कुटुंबाने ओढली आहे. भवरलाल जैन यांनी भारतात सूक्ष्म सिंचनाच्या प्रणालीचा पाया रचला होता.

भंडारी दाम्पत्यांसह ३५ जणांची नुकतीच चार किमींची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत त्यांनी आपले मोबाइल फोन आणि इतर वस्तू दान केल्या. या मिरवणुकीतील रथात भंडारी दाम्पत्य राजेशाही कपड्यांमध्ये बसलेले दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैन धर्मात दीक्षा घेण्याला एक वेगळे महत्त्व आहे. जिथे भौतिक सुखसोयींशिवाय जीवन जगण्याची कटिबद्धता दाखविली जाते. भिक्षेवर जगून भारतभर अनवाणी चालून धर्मोपदेश केला जातो.