चंडिगड : हरियाणामधील महेंद्रगढ, रेवारी आणि झाज्जर जिल्ह्यांमधील काही गावांच्या सरपंचांनी त्यांच्या गावांमध्ये मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घातल्याचे कथित पत्रे जारी केल्याचे उघड झाले आहे. ही पत्रे समाजमाध्यमांतून समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या पत्रांची नोंद घेण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

समाजमाध्यमांमध्ये उघड झालेली पत्रे जवळपास एकसमान आहेत. हरियाणामधील नुह, गुरुग्राम आणि इतर जिल्ह्यांमध्ये दहा दिवसांपूर्वी उसळलेल्या हिंसाचारामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. नुहमधील हिंसाचारात दोन गृहरक्षकांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या कथित पत्रांमध्ये असे सांगण्यात आले आहे की काही ग्रामपंचायतींनी मुस्लीम व्यापाऱ्यांना कोणताही व्यापार करण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये फेरीवाले, गुरांचे व्यापारी आणि भिक्षा मागणारे यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, महेंद्रगढ आणि रेवारी जिल्ह्यातील अनेक गावांच्या सरपंचांशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारे मुस्लिमांना उद्देशून कोणतेही पत्र लिहिल्याचे नाकारले. तर सरकारी अधिकाऱ्यांसमोर अशी कोणतीही पत्रे सादर झाली नसल्याचे महेंद्रगढच्या उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी सांगितले.

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना (एसडीएम)उद्देशून अशी पत्रे लिहिल्याचा दावा समाजमाध्यमांत करण्यात आला आहे. मात्र आमच्या माहितीनुसार अशी कोणतीही पत्रे एसडीएमकडे पोहोचलेली नाहीत. मात्र आम्ही याची दखल घेतली असून चौकशी सुरू आहे.             

– मोनिका गुप्ता,  उपायुक्त, महेंद्रगढ

आम्ही एसडीएमना उद्देशून अशा प्रकारे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. आम्ही वेगळय़ा मुद्दय़ावर पत्र लिहिले आहे. त्यामध्ये कोणत्याही एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख केलेला नाही.

– वेदप्रकाश, सरपंच, गोमला गाव

भाजपच्या शिष्टमंडळाला परवानगी, ‘आपला अडवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी हिंसाचारग्रस्त नूहच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने भाजपच्या शिष्टमंडळाला परवानगी देतानाच, ‘आप’च्या शिष्टमंडळाला मात्र नूह जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून अडवले. दीपेंदर सिंह हुडा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही मंगळवारी नूह जिल्ह्याला भेट देण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ हरियाणात आल़े  आपच्या सातसदस्यीय शिष्टमंडळाला रेवासन या गावामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच अडवले गेले. त्या भागात संचारबंदी असल्यामुळे त्यांना परत पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.