Sharad Pawar On Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत बिहार निवडणुकीच्या निकालाचं थेट विश्लेषण केलं आहे.

बिहारमध्ये एनडीएला एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत कसं मिळालं? त्यामागील कारणं काय आहेत? तसेच बिहारच्या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीचा पराभव का झाला? त्यामागील कारणं काय आहेत? याबाबत शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली. बिहारमध्ये एनडीएच्या एवढ्या जागा जिंकून येण्यामागचं कारण तेथील महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

बिहारच्या निवडणुकीचं विश्लेषण कसं कराल? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “बिहारच्या निवडणुकीचं मतदान झालं. त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘निवडणूक आयोगानेही गांभीर्याने विचार करावा…’

“महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्यावतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले, म्हणजे लाडकी बहीण योजना. आता प्रश्न असा आहे की यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.