बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जमुई जिल्ह्यामधील सिकंदरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणामध्ये मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. मांझी यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. भगवान रामचंद्र काही देव नाही ते केवळ एक पात्र होतं, माझा रामावर विश्वास नाही, असं वक्तव्य मांझी यांनी केलं.

“आपण रामायण लिहिणाऱ्या वाल्मीकि आणि तुलसीदास यांना मानतो,” असंही मांझी म्हणाले. “राम काही देवा नव्हता. वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी आपली गोष्ट सांगण्यासाठी एक पात्र बनवलं, ते रामाचं होतं,” असंही मांझी म्हणाले. “या पात्राच्या आधारे त्यांनी एक महाकाव्य रचलं. या महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात. त्या गोष्टी मी मानतो, मात्र मी रामाला मानत नाही,” असं मांझी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना मांझी यांनी, “पूजा केल्याने कोणी मोठं होतं नाही” असं सांगतानाच, “पाठपूजा करणं अनुसूचित जातीच्या लोकांनी बंद केलं पाहिजे,” असंही वक्तव्य केलं.

ब्राह्मणांवर टीका करताना मांझी यांनी, “जे ब्राह्मण मांस खातात, मद्यप्राशन करतात अशा ब्राह्मणांपासून दूर राहिलं पाहिजे,” असा सल्ला उप्सथितांना दिला. तसेच, “अशा ब्राह्मणांकडून पूजा आणि धार्मिक विधी करुन घेता कामा नये,” असंही मांझी म्हणाले. “तुम्ही पूजापाठ करणं बंद करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

आंबेडकर जयंतीनिमित्त सिकंदरा येथील हम पार्टचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.