ग्वाल्हेर : हिंदुस्तान (भारत) हे हिंदुराष्ट्र असून त्याचे मूळ हिंदुत्व हे आहे. हिंदू व भारत हे अविभाज्य आहेत, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. हिंदूंना हिंदू म्हणून राहायचे असेल, तर भारत ‘अखंड’ करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. हिंदू हे भारतापासून अविभाज्य आहेत आणि भारत हा हिंदूंपासून वेगळा न होऊ शकणारा आहे. भारताला हिंदू म्हणून राहायचे असेल, तर त्याला स्वत:ची ओळख टिकवावी लागेल आणि हिंदूंना हिंदू म्हणून कायम राहायचे असेल तर त्यांना या देशाला ‘अखंड’ बनवावे लागेल, असे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले. हिंदू स्वत:ची ओळख विसरले, त्या वेळी देशापुढे संकट उभे राहिले आणि ते खंडित झाले, याला इतिहास साक्षीदार आहे. मात्र आता हिंदूंचे पुनरुज्जीवन होत असून, जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. हिंदू जेथे राहात आहेत आणि आपल्या परंपरांचे पालन करत आहेत, तो हा हिंदुस्तान आहे. ‘हिंदू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्यांनी या भूमीचा विकास केला आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत, असेही मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानची निर्मिती झाली, कारण आम्ही हिंदू आहोत हा ‘भाव’ (ओळख) विसरलो. मुस्लीमही हे विसरले. ब्रिटिशांनी आमची हिंदुत्वाची ओळख नष्ट केली आणि भाषा, धर्माच्या आधारे देश विभाजित केला, असे भागवत म्हणाले. मोहन भागवत