पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दरम्यान चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय लष्कराला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये सध्या तणाव आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

…तर भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू, चीनची धमकी
…म्हणूनच नियंत्रण रेषेवरुन भारतासोबत वाद, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं कारण

चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.

यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. सकाळी ९ वाजल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली आहे.