केरळात २०१२ मध्ये दोन भारतीय मच्छामारांना गोळ्या घालून ठार केल्याच्या प्रकरणी इटलीच्या दोन नौसैनिकांपैकी मासिमिलियाने लाटोरे याच्या मायदेशी वास्तव्यास सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणात साल्वातोर गिरोनी हा दुसरा आरोपी आहे. न्यायालयाला केंद्र सरकारने सांगितले, की डिसेंबर २०१८ पर्यंत हा वाद लवादाच्या मार्फत तडजोडीने मिटवला जाईल. न्या. ए.आर.दवे, न्या. कुरियन जोसेफ व अमिताव रॉय यांनी सांगितले, की लाटोरे याला ज्या नियम व शर्तीनुसार भारत सोडून देण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्याचे पालन केले जाईल याची इटलीच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. महाधिवक्ता रणजित कुमार यांनी सांगितले, की जीनिव्हातील आंतरराष्ट्रीय लवादापुढे या प्रकरणाच्या सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. २०१८ च्या अखेरीस या प्रकरणाचा निकाल लागेल. भारताने सुनावणीसाठी २०१९ पर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १३ जानेवारीला केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय लवादासमोरील कामकाजाच्या संदर्भात माहिती देण्यास सांगितले होते. दरम्यान दोन नौसैनिकांवर फौजदारी खटला चालवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. भारत व इटली यांच्या संयुक्त विनंतीनुसार या प्रकरणी न्यायकक्षेचा प्रश्न सुटेपर्यंत, म्हणजे कुठल्या देशात याप्रकरणी सुनावणी व्हावी हा वाद मिटेपर्यंत, सुनावणी स्थगित करण्याचे न्यायालयाने मान्य केले होते. कुठल्या देशात सुनावणी व्हावी याचा निकाला आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार आहे. लवादापुढे कामकाज सुरू असेपर्यंत कामकाज स्थगित ठेवावे असे रणजितकुमार यांनी सांगितले. लवादाने निर्णय दिल्याशिवाय यात काही करता येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. वरिष्ठ वकील सोली सोराबजी यांनी नौसैनिकांची बाजू मांडताना लाटोरे याची मायदेशी वास्तव्याची मुदत वर्षअखेपर्यंत वाढवण्याची मागणी केली पण ती फेटाळण्यात आली. सोराबजी यांनी सांगितले, की सुनावणी चालू नसताना त्याला भारतात आणण्याचा आग्रह धरण्यात काही हशील नाही. एनरिका लेक्सी या जहाजावरून या दोन नौसैनिकांनी १५ फेब्रुवारी २०१२ रोजी गोळीबार केला होता, त्यात दोन भारतीय मच्छीमार ठार झाले होते. मच्छीमारांच्या वकिलांनी साल्वातोरी गिरोनी याला भारताबाहेर राहू देऊ नये. लाटोरे याला पक्षाघात झाला असून त्याला १२ सप्टेंबर २०१४ रोजी चार महिने मायदेशी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. सेंट अँटनी या मच्छीमारांच्या बोटीचे मालक फ्रेडी यांनी याबाबत तक्रार दिली होती. इटलीच्या नौसैनिकांनी चाचे असल्याच्या संशयावरून भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला. त्यात ते ठार झाले होते.