पाकिस्तानच्या तुरुंगात झालेल्या मारहाणीमुळे भारतीय कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी गुरुवारी जम्मू – काश्मीर शासनाने हा प्रश्न केंद्राच्या दरबारात मांडण्याचा निर्णय घेतला आह़े  अशी अमानुष कृत्ये या पुढे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कडक शब्दांत पाकिस्तानला खडसाविण्याची मागणी भाजपचे नेते बलवीर पुंज यांनीही केली आह़े
आम्ही याबाबत अधिक तपशिलाची मागणी करू आणि हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे नेऊ, असे जम्मू-काश्मीरचे गृहराज्य मंत्री सज्जद अहमद किचलो यांनी बुधवारी सांगितल़े
जम्मू येथील रहिवासी चमेल सिंग या साठ वर्षांच्या गृहस्थाचा लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात मृत्यू झाला़  शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या मृतदेहावर चार ठिकाणी जखमा आणि अस्थिभंग झाल्याचे आढळून आल़े  त्यामुळे त्यांच्यावर लाहोरच्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल़े  शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर शासनाकडून घेण्यात आला़
सिंग यांचा मृतदेह मिळविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती किचलो यांनी दिली़  दरम्यान, पाकिस्तानला खडसाविण्याची मागणी करणाऱ्या पुंज यांनी, पाकिस्तानकडून अशा प्रकारची कृत्ये वारंवार होत असल्याचा आरोप केला आह़े  नुकतीच पूंछ सीमेवर दोन भारतीय जवानांचे शिर कापण्याच्या घटनेचीही त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आठवण करून दिली़  पाकिस्तानच्या अशा कृत्यांतून त्यांची भारतीयांबद्दलची आणि विशेषत: हिंदूंबद्दलचा द्वेष दिसून येतो, असेही ते म्हणाल़े
भारत आणि पाकिस्तान आपसातील वैमनस्य मिटवीत नाहीत, तोवर अशा घटना घडतच राहणार आहेत आणि याची सर्वाधिक झळ जम्मू-काश्मीर राज्यांना सोसावी लागणार आहे, असे राष्ट्रीय परिषदेचे मुस्तफा कमाल यांनी म्हटले आह़े