वृत्तसंस्था, जेरुसलेम
इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराणने शुक्रवारी रात्रभरात आणि शनिवारी सकाळी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. त्यामध्ये तेल अविवच्या किरया भागातील इस्रायलच्या लष्करी मुख्यालयाला आणि संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य करण्यात आले. इराणने हे हल्ले सुरूच ठेवले तर त्यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र केले जातील असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सांगितले. तर, तेहरानला बेचिराख करू असा इशारा संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी दिला. यानंतर, शनिवारी इस्रायलने दक्षिण भागातील पारस तेल व वायू शुद्धिकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ले केले असे इराणने जाहीर केले.
इस्रायलने शुक्रवारी इराणच्या आण्विक, क्षेपणास्त्र आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर इराणने शुक्रवारी रात्रभरात इस्रायलची राजधानी तेल अविव आणि जेरुसालेम या शहरांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली.
दरम्यान, आयर्न डोमला लक्ष्य करण्यात इराणला यश आले असले तरी त्यांची अनेक क्षेपणास्त्रे निकामी केल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. या हल्ल्यांमध्ये किमान तीन इस्रायली ठार झाले आणि ७०जण जखमी झाले. जेरुसालेम आणि तेल अविव या महत्त्वाच्या शहरांमध्ये रात्रभर हल्ल्यांचे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. हे हल्ले सुरूच राहतील असे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये आणखी एक युद्ध लांबण्याती भीती वाढली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आणि ३२०पेक्षा जास्त लोक जखमी झाले असे इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूतांनी सांगितले. हे हल्ले हे इराणच्या भूमीतूनच करण्यात आले. ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये मोसाद या इस्रायली गुप्चचर संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. मोसादच्या हेरांनी हे ड्रोन आणि शस्त्रास्त्रे आधीच छुप्या मार्गांनी इराणमध्ये नेले होते आणि तिथेच ड्रोनवर शस्त्रे लादण्यात आली होती.
आमच्या अस्तित्वाला असलेला कोणताही धोका नष्ट करू असा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिला आहे. त्याचवेळी इराणी जनतेने त्यांच्या नेत्यांविरोधात बंड करावे असेही सुचवले आहे. दुसरीकडे, इस्रायल आमच्यावर हल्ले करत असताना आम्ही आमच्या देशाबरोबर उभे राहू अशी प्रतिक्रिया इराणी नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी ‘सीएनएन’शी बोलताना व्यक्त केली.
भारताकडे मध्यस्थीची क्षमता!
इस्रायल आणि इराणदरम्यान वाढलेल्या तणावाबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. तर, हा तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची भारताकडे क्षमता आहे असे इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी म्हटले आहे. भारत दोन्ही देशांशी संवाद साधू शकतो असे अझर म्हणाले.
अणुकरार चर्चेवर प्रश्नचिन्ह
इराण आणि अमेरिकेदरम्यान अणुकरारावर चर्चेची पुढील फेरी ओमानमध्ये रविवारी होणार आहे. त्यावर आता अनिश्चिततेचे सावट असले तरी, इराणला अणुकरार करण्यासाठी आणखी एक संधी असल्याचे मत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. तर इस्रायलच्या हल्ल्यांनंतर अमेरिकेबरोबर करारावर पुढे चर्चा करणे निरर्थक असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेरी यांनी सरकारी वाहिनीशी बोलताना सांगितले.
लवकरच तुम्हाला तेहरानच्या आकाशात सर्वत्र इस्रायलच्या हवाई दलाची विमाने दिसतील. अयातुल्ला यांच्या राजवटीतील प्रत्येक केंद्र आणि प्रत्येक लक्ष्यावर आम्ही हल्ले करू. – बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल