पन्नास कोटी वर्षांपूर्वी एका जनुकीय अपघातामुळे मानवाला बुद्धिमत्ता प्राप्त झाली व त्याची तर्कसंगत विचार करण्याची क्षमताही तयार झाली असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. एडिंबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी मानव व सस्तन प्राण्यांची बुद्धिमत्ता कशी विकसित झाली याविषयी संशोधन केले आहे.
मानवाची वानरापासून जी उत्क्रांती होत गेली त्यात त्याच्या मेंदूतील जनुकांची संख्या वाढली व त्यामुळे त्याला बुद्धिमत्ता प्राप्त झाली. वैज्ञानिकांच्या मते ज्या जनुकांनी मानवाला बुद्धिमत्ता प्राप्त करून दिली आहे तीच जनुके त्याला मेंदूचे विकार होण्यास कारणीभूतही ठरत आहेत.
५० कोटी वर्षांपूर्वी अपृष्ठवंशीय प्राणी सागरात राहत होते. त्यांच्यातही जनुकीय अपघात होऊन या जनुकांच्या जादाच्या प्रती तयार झाल्या. त्याचा पुढच्या उत्क्रांत प्राण्यांना फायदा झाला. सर्वात मोठा वैज्ञानिक प्रश्न म्हणजे उत्क्रांतीच्या दरम्यान मानवाची बुद्धिमत्ता व गुंतागुंतीचे वर्तन कसे विकसित होत गेले.
‘नेचर न्यूरोसायन्स’मध्ये दोन संशोधन निबंधांत याबाबत माहिती दिली असून त्यात वर्तनातील उत्क्रांती व मेंदूविषयक आजारांचे मूळ यांचा संबंध जोडला गेलेला आहे. मानसिक विकार समजून घेण्यासाठी या संशोधनांचा फायदा होणार आहे तसेच नवीन औषधयोजनाही करणे शक्य होणार आहे असे ‘वेलकम ट्रस्ट’च्या न्यूरोसायन्स अँड मेंटल हेल्थ या शाखेचे प्रमुख जॉन विल्यम्स यांनी सांगितले.
उंदरांच्या मानसिक क्षमता व मानवाच्या क्षमता यांच्या तुलनात्मक अभ्यासातून अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. मानव तसेच उंदीर यांच्यात उच्च प्रतीची मेंदूनियंत्रित कामे करणारी जनुके सारखीच आहेत.
या जनुकांमध्ये उत्परिवर्तन घडून आल्याने या कार्यात बिघाडही होऊ लागले. उच्च बुद्धिमत्तेची किंमतही चुकवावी लागते कारण जेवढे वर्तन गुंतागुंतीचे तेवढे मेंदूचे आजार अधिक होतात असे ग्रँट यांनी म्हटले आहे.
केंब्रिज विद्यापीठाचे डॉ. टिम ब्युसे यांच्या मते आता आपण जनुकशास्त्र व वर्तन चाचण्या यांचा
वापर करून औषधोपचार करू
शकू.