Jairam Ramesh on Mohan Bhagwat & PM Narendra Modi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले, “मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या” यावरून भागवत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रोख होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोदी काही महिन्यांत ७५ वर्षांचे होत असून संघाने मोदींना बाजूला होण्याचा सल्ला दिल्याचं वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, सरसंघचालकांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मोदी व भागवत हे दोघेही येत्या सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होतील, असं काँग्रेसने म्हटलं आहे. दोघांच्या वाढदिवसांमध्ये केवळ सहा दिवसांचं अंतर असल्याचं देखील काँग्रेसने नमूद केलं आहे.
जयराम मरेश यांना मोदी व भागवतांना चिमटा
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “पाच दिवसांचा राजकीय दौरा आटपून मोदी भारतात आले आहेत. बिचारे पंतप्रधान पुरस्कार जिंकून भारतात परतले आहेत आणि बघा, कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातंय. मोदी भारतात परतताच सरसंघचालकांनी त्यांना आठवण करून दिली आहे की ते येत्या १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते ७५ वर्षांचे होत आहेत.”
एका दगडात दोन पक्षी : जयराम रमेश
जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की “पंतप्रधान मोदी देखील सरसंघचालकांना आठवण करून देऊ शकतात की ते देखील येत्या ११ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. एका दगडात दोन पक्षी.” रमेश यांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी देखील मोदींवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की “आता दोघांनी आपापल्या झोळ्या उचला आणि एकमेकांना मार्गदर्शन करायला जा.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरील ‘मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी पंचाहत्तरीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.