केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवारी) संसदेत काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. तसेच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून लडाख हा केंद्र शासित प्रदेश म्हणून उदयास येणार आहे. एकीकडे देशात केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचं स्वागत होत आहे. तर दुसरीकडे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मात्र मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला असून अनेक गुतवणुकदारांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

एकीकडे हलाकीच्या आर्थिक परिस्थितीत सापडलेल्या पाकिस्तानला सोमवारी आणखी एक झटका बसला. भारताने कलम 370 हटवण्याची केलेली शिफारस पाकिस्तानला मोठा झटका देणारी ठरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणादरम्यान पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानच्या शेअर बाजारात झालेली वर्षभरातली ही सर्वात मोठी घसरण आहे. पाकिस्तानी शेअर बाजाराचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स केएसई-100 हा 600 अंकांनी घसरून 31 हजार 100 वर आला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत यामध्ये 1.75 टक्क्यांची घट पहायला मिळाली.

शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू आणि काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक 2019 सादर केले. तसेच लडाख हा केंद्रशासित प्रदेश करण्याची घोषणा केली. त्या ठिकाणी चंडीगढप्रमाणे विधानसभा नसेल. त्यांच्या या घोषणेचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर झाला. यापूर्वी भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला होता. त्यावेळी शेअर बाजार तीन दिवसांमध्ये 2 हजार पेक्षा अधिक अंकांनी घसरला होता.