अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. जागतिक स्तरावरील सर्वात महत्वाच्या मंचावरुन भारताने शनिवारी हे स्पष्ट केलं आहे की जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानवरच निशाणा साधलाय.

भारताने पाकिस्तानवर हल्लाबोल करताना दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केलाय. भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर, “जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही कायमच तसाच राहील,” असं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये बोलताना भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दांमध्ये टिका केली. “आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहिलं. सध्याच्या जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणं स्वीकार करण्याची गोष्ट नाहीय,” असा टोला दुबे यांनी लगावला.

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा रेकॉर्डेड संदेशाचा व्हिडीओ आमसभेमध्ये चालवण्यात आला. यात इम्रान यांनी १३ वेळा काश्मीरचा उल्लेख केला आहे. तसेच हुर्रियत नेते सैय्यद अली शाह गिलानी यांच्या पार्थिवासंदर्भात खोटा प्रचारही इम्रान यांनी आपल्या व्हिडीओतून करण्याचा प्रयत्न केला.