जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी हैदरपोरा चकमकीच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी, एक OGW आणि एक व्यावसायिक इमारतीचा मालक ठार झाले, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

“हैदरपोरा चकमकप्रकरणी एडीएम दर्जाच्या अधिकाऱ्याकडून दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल सादर होताच सरकार योग्य ती कारवाई करेल. जम्मू-काश्मीर प्रशासन निष्पाप नागरिकांच्या जीवनाचे रक्षण करण्याचं वचन नेहमी पूर्ण करेन. तसेच कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,” असे एलजीच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

चार मृतांपैकी अल्ताफ अहमद भट, डॉ मुदस्सीर गुल तसेच आमिर मगरे निर्दोष आहेत, असे म्हणत कुटुंबीयांनी पोलिसांचे दावे फेटाळून लावले आहेत. बुधवारी उशिरा श्रीनगरच्या प्रेस एन्क्लेव्हमध्ये मेणबत्ती पेटवून नातेवाईकांचे मृतदेह परत मिळावेत, या मागणीसाठी जमलेल्या कुटुंबांना जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जबरदस्तीने हटवले होते. दरम्यान, मारल्या गेलल्या चारही जणांचे मृतदेह श्रीनगरपासून ७० किलोमीटरहून अधिक अंतरावरील हंदवाडा येथे पुरण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

श्रीनगरमधील हैदरपोरा येथे झालेल्या वादग्रस्त चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवादी आणि दोन व्यावसायिकांना ठार केल्याचा आरोप आहे. दोन्ही व्यावसायिक ‘दहशतवाद्यांचे समर्थक’ असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात व्यापारी मोहम्मद अल्ताफ बट आणि डॉक्टर कम व्यापारी डॉ. मुदस्सीर गुल मारले गेल्याचे पोलिसांनी आधी सांगितले होते पण नंतर त्यांनी विधान बदलून ते ‘क्रॉस फायरिंग’मध्ये मारले गेले असावेत, असं म्हटलं होतं. दरम्यान, दुसरीकडे सुरक्षा दलांनी दोघांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.