पीटीआय, शिवमोगा : काँग्रेसच्या खोटारडेपणाचा काही उपयोग न झाल्यामुळे, ‘घाबरलेल्या’ या पक्षाने त्याच्या अनुभवी नेत्यांना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्या पक्षाला हाणला. ‘आता काँग्रेस पक्ष इतका घाबरलेला आहे की, प्रचारात भाग घेत नसलेल्यांनाही येथे आणले जात आहे. पराभवाची जबाबदारी इतरांवर ढकलण्याची काँग्रेसने सुरुवात केली आहे,’ असे सोनिया गांधी यांचे नाव न घेता मोदी एका प्रचारसभेत म्हणाले. काँग्रेसचा खोटय़ाचा फुगा लोकांनी फोडला असल्यामुळे तो आता उपयोगी येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकृतीच्या कारणामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रचार आणि जाहीर सभांपासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी हुबळी येथे प्रचारसभेला संबोधित केले होते. रविवारी बंगळूरुत झालेल्या आपल्या रोड शोला मिळालेल्या प्रतिसादामुळे आपण भारावून गेलो असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘रविवार असूनही बंगळूरुने जी ताकद प्रदर्शित केली, जो विश्वास आणि प्रेम दाखवले, ते माझ्या हृदयाला स्पर्शून गेले आहे. मी कर्नाटकचा ऋणी राहील,’ असे मोदी म्हणाले. लोकांनी आपल्यावर प्रेम व आशीर्वाद यांचा जो वर्षांव केला आहे, त्याची आपण परतफेड करू इच्छितो, असेही त्यांनी सांगितले. हनुमानाची मूर्ती भेट या सभेत मोदी यांना हनुमानाची मूर्ती आणि भगव्या रंगाची पगडी भेट देण्यात आली, तेव्हा जमावाने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या, तर पंतप्रधानांनी ‘बजरंगबली की जय’ ही घोषणा द्यायला लावली. विहिंपतर्फे उद्या हनुमान चालीसा पठण बंगळूरू : विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाने मंगळवारी ९ मे रोजी देशभर हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होत आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्यात जातीय तणाव वाढवणाऱ्या संघटनांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यात त्यांनी बजरंग दल तसेच पीएफआयचा उल्लेख केला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. बंगळूरुत दुसऱ्या दिवशीही ‘रोड शो’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी कर्नाटकात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी बंगळूरुमध्ये आठ किलोमीटरच्या ‘रोड शो’ काढला. भाजपशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थिप्पासंद्रा येथील केम्पेगौडा यांच्या पुतळय़ापासून ‘ट्रिनिटी सर्कल’पर्यंत हा ‘रोड शो’ काढण्यात आला. तो सुमारे दीड तास चालला. प्रारंभी बंगळूरुचे संस्थापक केम्पेगौडांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. ही प्रचारयात्रा पाच विधानसभा मतदारसंघातून गेली. भ्रष्टाचार, बेरोजगारी हाच खरा दहशतवाद -प्रियंका कर्नाटकात सध्या भ्रष्टाचार, लूटमार, भाववाढ आणि बेरोजगारी हाच खरा दहशतवाद असून त्याला आळा घालण्यात सत्तारुढ भाजपला अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी रविवारी केली. दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मूदबिद्री येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. देशात कोणत्याही ठिकाणी निवडणूक असली की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अन्य नेते अतिरेकी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, मोदींसह हे भाजपचे नेते लोकांच्या खऱ्या प्रश्नांबाबत बोलत नाहीत. त्यांना मी सांगू इच्छिते की भाववाढ, बेरोजगारी आणि भाजप सरकारचा ४० टक्के भ्रष्टाचार हा खरा दहशतवाद आहे. भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने दिली जातात. पण, कर्नाटकात गेल्या तीन वर्षांत भाजपने काय केले, हे पाहूनच लोकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.