संघराज्य सहकार्यास बाधक असल्याचा आक्षेप तिरुवनंतपुरम : भारतीय प्रशासकीय सेवा (केडर) नियम, १९५४ मध्ये बदल करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन विरोध केला असून हे प्रस्तावित बदल मागे घेण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी लिहिलेल्या पत्रात केली आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्यांबाबतचे नियम बदलण्याच्या या प्रस्तावास अन्य बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही विरोध केला आहे. हे बदल केल्यास राज्य सरकारच्या कारभारावर विपरित परिणाम होईल, असा आक्षेप संबंधित राज्यांनी घेतला आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात विजयन यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित बदलांमुळे भयाची मानसिकता तयार होईल. यातून विशेषत: केंद्रातील सत्तेच्या विरोधात असलेल्या पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांची धोरणे राबविण्याबाबत सनदी अधिकाऱ्यांत अडवणूक करण्याची भावना तयार होईल. सध्याचे नियम हेच बरेचसे केंद्र सरकारला अनुकूल आहेत. त्यातही आणखी बदल केल्यास संघराज्याची परस्पर सहकार्याची चौकट आणखी कमकूवत केली जाईल, असा आक्षेप विजयन यांनी नोंदविला आहे.