‘राज्यातील ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात असून त्यांना नंतर विदेशात नेण्यात येते, त्यांना एकापेक्षा जास्त व्यक्तिंबरोबर रहायला लागते व काही वेळा तर त्यांना सेक्स स्लेव्ह केले जाते’, असा आरोप केरळच्या एका कॅथलिक चर्चने केलाय. केरळमध्ये लव्ह जिहाद ही काल्पनिक घटना नसून ते वास्तव असल्याचं सायरो-मलबार चर्चने म्हटलं आहे. ज्या ख्रिश्चन मुलींना इस्लाममध्ये धर्मांतर करुन परदेशात नेण्यात आलंय त्या प्रतिष्ठित धार्मिक जीवन जागत नाहीयेत, उलट लैंगिक गुलाम होण्याची सक्ती त्यांच्यावर केली जातेय असा दावा देखील चर्चकडून करण्यात आला आहे.

‘ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करुन परदेशात नेल्याचे अनेक प्रकार घडले. परदेशात गेलेल्या तरुणी खडतर जीवन जगतायेत. त्यांना बळजबरीने एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत राहण्यास भाग पाडलं जात आहे. काहींना तर सक्तीने लैंगिक गुलाम देखील बनवण्यात आलंय’, असा आरोप सायरो-मलबार चर्चने केला आहे. ख्रिश्चनांवर जगभरात होत असलेल्या हल्ल्यांचा संदर्भ देऊन सायरो-मलबार चर्चने चिंता व्यक्त केलीये आणि ‘लव्ह जिहाद’ ही केवळ कल्पना नसून तो प्रत्यक्षात अस्तिवात आहे, असंही चर्चने म्हटलंय.

‘लव्ह जिहाद’वरून धर्मांमधील सलोखा कमी होऊ नये, यासाठी सरकारने हा विषय हाताळताना धार्मिक मुद्दा म्हणून नव्हे तर कायद्याशी संबंधित म्हणून हाताळावा, अशी विनंती चर्चने केली आहे. तसेच ‘आयएस’मध्ये नुकत्याच भरती केलेल्या २१ जणांचे ख्रिश्चन धर्मातून मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले होते, हे डोळे उघडणारे आहे. पालक आणि मुलांनीही लव्ह जिहादमधील धोके ओळखण्याची गरज आहे, असे देखील चर्चने म्हटले आहे. “प्रेमप्रकरणं याआधीही घडली आहेत. परंतु ख्रिश्चन मुलींना लक्ष्य करण्यात येत असेल व प्रेमाच्या नावाखाली त्यांचे खून करण्यात येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असं चर्चनं म्हटलं आहे.

तर, भाजपा नेते कुम्मनम राजसेखरन यांनी, “चर्चकडून करण्यात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची योग्यरीत्या चौकशी व्हावी. लव्ह जिहादच्या तक्रारी राज्यात सातत्याने वाढतायेत, पण राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होतंय. राज्य सरकार या विषयावर गंभीर नाही. राज्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये लव्ह जिहादच्या शेकडो तक्रारी आल्या पण अद्याप एकालाही पोलिसांनी अटक केली नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.