दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे आलेला पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टयम. इडुक्की या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या पर्वतीय भागात दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये अनेकजण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोट्टयम, इडुक्की आमि पथनमथिट्टा इथल्या पर्वतीय भागात पूर आला असून मीनाचल आणि मणिमाला या नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. समोर आलेली परिस्थिती भीषण असल्याचं सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं की अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या २४ तासांसाठी नागरिकांनी आपल्या घरातच किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पावसामुळे सध्या दक्षिण आणि मध्य भागातल्या जिल्ह्यांना फटका बसलेला आहे. संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता अधिक वाढून उत्तरेकडच्या जिल्ह्यांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या काही नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. धरण आणि नदीपात्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. तर पथनमथिट्टा, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर थिरुवनंतपूरम, कोल्लम, अलाप्पूझा, पलक्कड, मलप्पूरम, कोझिकोडे आणि वायनाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.