Kolkata Rape Case : कोलकाताच्या आरजी कार महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. या कृत्याविरोधात येथील डॉक्टरांनी आंदोलन पुकारल्यानंतर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून करण्यात आला. या सर्व घडामोडींमध्ये या रुग्णालयाच्या प्राचार्यच बदलण्यात आले आहेत. आता या जागी सुश्रीता पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, पदभार स्वीकारताच त्यांनी डॉक्टरांवर संताप व्यक्त केला आहे.

मध्यरात्री जमावाने केलेल्या हल्ल्याबाबत तत्काळ कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागणी पूर्ण कराव्यात अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात येत होती. परंतु, यावरून सुश्रीता पाल यांनी संताप व्यक्त केला. “मला काही अधिकृत काम करण्यासाठी एक तास हवा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मी जाणार नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका”, असं सुश्रीता पाल म्हणाल्या.

हेही वाचा >> Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आंदोलनकर्त्या डॉक्टरांचा पोलिसांवर ‘हा’ आरोप, प्रकरण सीबीआयकडे

संदिप घोष यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारच्या आरोग्य खात्यात असलेल्या सुश्रीता पाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. संदीप घोष यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. परंतु, राजीनामा देताच त्यांची नॅशनल मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवरून उच्च न्यायालयाने खेडबोल सुनावले. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले. ते सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर सुश्रीता पाल यांची आरजी. कार महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यरात्रीचा धुसगूस जाणीवपूर्वक

९ ऑगस्ट रोजी कोलकाताच्या आर.जी कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला. अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. यावरून देशभरातली वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले. अनेक रुग्णालयांमध्ये संप पुकारण्यात आला. आर. जी. कार महाविद्यालयातही शांततेत आंदोलन सुरू होते. परंतु, १५ ऑगस्टच्या मध्यरात्री या आंदोलनात जमाव घुसला आणि त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची नासधूस करून औषधालयही लक्ष्य केले. जमावाने जाणीवपूर्वक ही नासधूस केल्याचा दावा करण्यात येतोय.