काही वृत्तवाहिन्यांच्या कथित ‘इंडिया’विरोधी निवेदकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. आता या निवेदकांची नावेच काँग्रेस नेते पवन खेरा यांनी जाहीर केली आहेत. हे सर्व निवेदक सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) जवळचे मानले जातात.
काही वृत्तवाहिन्यांच्या कथित ‘इंडिया’विरोधी निवेदकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली होती. न्यूज अँकरच्या बहिष्कारावर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, पत्रकार ‘इंडिया’ विरोधात बोलतात. मी विशेषत: गोदी मीडियाबद्दल बोलत आहे. काही अँकर आहेत जे सतत इंडिया आघाडीविरोधात बोलतात. आमचे प्रतिनिधी तेथे जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.”
दरम्यान, इंडिया आघाडीने हा निर्णय घेतल्यानंतर भाजपाने या विरोधात रान उठवले. त्यामुळे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “सायंकाळी पाच वाजता काही चॅनेल्सवर द्वेषाचा बाजार भरलवला जातो. या बाजारात अनेक पक्षाचे प्रवक्ता जातात. काही विश्लेषक जातात. पण आपण सर्व द्वेषाच्या बाजारात ग्राहक बनत जातोय. आम्हाला या द्वेषाविरोधात पाऊल उचलायचं होतं. आम्ही आज निर्णय घेतला आहे की, काही अँकरच्या शो किंवा इव्हेंटमध्ये आम्ही जाणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांविरोधात हेडलाईन्स बनवता, त्यांचे मिम्स बनवतात. त्यांच्या भाषणांचं ट्विस्ट करून फेक बातम्या पसरवल्या जातात. पण आम्ही लढायला तयार आहोत. पण तुम्ही समाजात द्वेष निर्माण करत असाल तर, हिंसेच्या रुपात तुम्ही द्वेष निर्माण करत असाल तर आम्ही त्याच्यात भागीदार होणार नाही. आम्ही अँकर्सचा द्वेष करत नाही. आम्ही आमच्या भारतावर प्रेम करतो. त्यामुळे या द्वेषाच्या बाजाराला बंद करण्याच्या दिशेने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण पवन खेरा यांनी दिलं आहे.
इंडिया आघाडीची पहिली सभा भोपाळमध्ये
सनातन धर्माचा वाद तीव्र झाला असताना राष्ट्रीय स्तरावर भाजपेतर ‘इंडिया’ महाआघाडीने पुन्हा ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न बुधवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीतून केला. राज्यस्तरावर जागावाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांची पहिली संयुक्त सभा पुढील महिन्यात भोपाळमध्ये होईल. या सभेतून विरोधकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले जाईल.