सोशल मिडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार तिला अटकही झाली होती. परंतु, आता ज्या व्यक्तीने तिच्याविरोधात तक्रार केली होती, तोच बेपत्ता असल्याचा दावा तक्रारदार वजाहत खानच्या वडिलांनी केला आहे. गेल्या रविवारपासून तो बेपत्ता असून शर्मिष्ठाला अटक झाल्यापासून कुटुंबाला धमकीचे फोन येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी मौन बाळगल्याबद्दल शर्मिष्ठा पानोलीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीकाही होऊ लागली. त्यानंतर तिने हा व्हिडिओ डिलिट करून माफीही मागिली. परंतु, तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी तिला समन्स बजावली आणि याप्रकरणी तिला १४ दिवसांची कोठडीही सुनावण्यात आली. शर्मिष्ठा पानोलीला कोलकाता पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी संताप व्यक्त करण्यात आला आणि अनेक भाजप नेत्यांनी सुटकेची मागणी केली. पानोलीविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदार वजाहत खानला पानोलीच्या अटकेनंतर धमकीचे फोन आले, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. “माझा मुलगा निर्दोष आणि धर्मनिरपेक्ष आहे. तो हिंदू धर्माचा अपमान करू शकत नाही. शर्मिष्ठाच्या अटकेपासून आम्हाला धमक्या येत आहेत”, असं त्याचे वडील सआदत खान यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

वजाहत खानविरोधातही तक्रार दाखल

दरम्यान, वजाहत खानविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. त्यानेही त्याच्या सोशल मिडिया खात्यावरून हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा केला जातोय. श्री राम स्वाभिमान परिषदेने दाखल केलेल्या तक्रारीत वजाहत खानवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदू समुदायाविरुद्ध अपमानजनक आणि भडकाऊ टिप्पणी केल्याचा आरोप आहे. गार्डन रीच पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या आणि २ जून रोजीच्या या पत्रात, पोलिसांनी खानविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या १९६(१)(अ), २९९, ३५२, ३५३(१)(क) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६अ आणि ६७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे.

तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की खान यांनी हिंदूंचे वर्णन करण्यासाठी “बलात्कारी संस्कृती” आणि “मूत्र पिणारे” अशा शब्दांचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यात पुढे म्हटले आहे की खान यांनी हिंदू देवतांना लक्ष्य करून अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट भाषा वापरली आणि हिंदू धार्मिक परंपरा, मंदिरे आणि सणांची खिल्ली उडवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पत्रात खानवर जातीय तणाव निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे अशा उद्देशाने मजकूर पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील अशांतता रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.