भारतातील लोकांचे सक्षमीकरण ही ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीची महत्त्वाकांक्षा असून  डिजिटायझेशनमध्ये भारताचे भविष्य बदलण्याची क्षमता आहे आणि यामध्ये मोलाची भूमिका बजावण्याची आमची इच्छा आहे, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले. ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे मुंबईत आयोजित ‘फ्युचर अनलिश्ड’ कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी नाडेला यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.

भारताच्या सक्षमीकरणात हातभार लावण्याची ‘मायक्रोसॉफ्ट’ची इच्छा असून सध्याच्या संगणकीय युगात मोबाईलवरच संगणकाची सर्व कार्यपद्धती उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नाडेला यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतातील स्टार्टअप कंपन्यांच्या मदतीने काही विशेष प्रोग्राम्स तयार करत असून याद्वारे शहरातील वाढत्या समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवल्या जाणार आहेत. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्मार्टसिटी प्रकल्पाशी निगडीत असणार आहे.

फडणवीस यांनी नाडेला यांच्यासोबत ‘स्मार्टसिटी’ बरोबरच ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पाच्या उद्देशांबाबतची चर्चा केली. उद्योग सुरू करण्यासाठी पूर्वी ७६ प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागत असत. हा आकडा आता ३६ पर्यंत कमी केला आहे. यातही आणखी सुधारणा करून २५ परवानगी घ्याव्या लागतील, अशी व्यवस्था केली जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.