मोदी सरकारने काश्मीरला विशेष अधिकार देणारे ३७० कलम हटवल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जम्मू काश्मीर आणि लडाखमधील पर्यटन व्यवसायात पाय ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रिसॉर्ट उभारणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री आणि एमटीडीसीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी सांगितले.
कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत करून रावल म्हणाले, कलम रद्द केल्याने एमटीडीसीला नवीन संधी खुल्या झाल्या आहेत. काश्मीर आणि लडाखमध्ये मालमत्ता विकत घेऊन रिसॉर्ट उभारण्याच्या दृष्टीने महामंडळ विचार करीत आहोत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ गेल्या दोन दशकांपासुन पर्यटन व्यवसायात आहे आणि काश्मीरमध्ये गुंतवणुक करण्यास उत्सुक आहे. महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काश्मीरमध्ये सुरक्षित पर्यटनाच्या कल्पनेला पर्यटक प्राधान्य देतात. त्यामुळे आता काश्मीरमध्ये थ्री आणि फोर स्टार सोयीसुविधा असलेले रिसॉर्ट उभारण्याची एमटीडीसीची योजना आहे.
काश्मीर खोऱ्यातील लोकही नवीन रोजगार, गुंतवणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. एमटीडीसीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रिसॉर्टच्या माध्यमातून काश्मीरी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यटनामुळे अर्थव्यवस्था आणि काश्मीरच्या विकासालाही चालना मिळेल. या नव्या संधीसाठी एमटीडीसी तयार आहे, असे रावल म्हणाले. दरम्यान, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणारा प्रस्ताव राज्यसभेबरोबरच लोकसभेतही मंगळवारी मंजुर करण्यात आला आहे. तसेच काश्मीरचे विभाजन करण्याचे विधेयकही संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुर झाले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदीवरील बंधने निकाली निघाली आहेत.