पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोकळ आश्वासने दिल्याच्या काँग्रेसच्या टीकेला मोदींनी आज प्रत्युत्तर दिले. मोदींची आश्वासने केवळ हवाबाज असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. त्याला उत्तर देताना ‘हवालाबाज’ विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करीत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशनात काँग्रेसच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज एकदिवसही चालू शकले नव्हते. त्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर टीका केली. देशासाठी महत्त्वाचे असलेले वस्तू व सेवा कर विधेयक काँग्रेसमुळे संसदेमध्ये मंजूर होऊ शकले नाही, असाही आरोप मोदी यांनी केला.
दहाव्या विश्व हिंदी संमेलनाचे उदघाटन गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, ‘हवालाबाज’ देशाच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. त्यामुळेच त्यांनी वस्तू व सेवा कर विधेयक पावसाळी अधिवेशनात संसदेमध्ये मंजूर होऊ शकले नाही. याला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसवगळता इतर सर्व पक्षांना संसदेचे कामकाज चालावे, असे वाटत होते. काँग्रेसने आडमुठेपणा घेतल्याने विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्तावही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काळ्या पैशांविरोधात सरकारने कठोर पावले उचलल्यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. निवडणुकीपूर्वी मोदींनी दिलेली आश्वासने म्हणजे केवळ हवाबाजी होती, असे त्यांनी म्हटले होते. सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले असून, त्याची अवस्था गोंधळल्यासारखी झाली असल्याचेही त्यांनी म्हटले होते.