Sharad Pawar on America Interference in India-Pak Conflict : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव शांंत झाल्याची माहिती सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियामार्फत दिली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सुरक्षा दलांसह संयुक्त पत्रकार परिषदेत शस्त्रविरामाची घोषणा केली. या दोन देशातील अंतर्गत वादासंदर्भातील माहिती तिसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी केल्याने अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
विशेष अधिवेशनावर काय म्हणाले शरद पवार?
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती मिळण्याकरता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय. मात्र, अशा विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले, विशेष अधिवेशनाला माझा विरोध नाही. पण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर खुली चर्चा होऊ शकत नाही. याच्या आधी एक दोनवेळा असे प्रकार झाले आहेत. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांनी मला आणि काही लोकांना बोलावलं, काय प्रकार झाला याची माहिती दिली. कारण, त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. नेमकं काय घडलंय हे सरकारने विशेष अधिवेशनात सांगावं अशी सर्वांची अपेक्षा असणार. पण याबाबतीत बोलण्यावर मर्यादा येतील. विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही. पण त्यापेक्षा दहा-वीस लोकांना बोलावून यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं पाहिजे.”
अमेरिकेने हस्तक्षेप का केला?
भारत पाकिस्तानदरम्यान झालेल्या शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मात्र, यावरून आता विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली आहे. यावर शरद पवार म्हणाले, “मला शिमला करार आठवतोय. शिमला करार इंदिरा गांधी आणि झुलफिकार अली भुट्टो यांच्यात झाला होता. दोन देशांतील समस्येवर तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करून नये असा हा करार झाला आहे. असं असताना अमेरिकेची मदत घेण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न कोणी विचारला तर केंद्राला यावर उत्तर द्यावं लागेल. कारण, आतापर्यंत दोन देशांतील अंतर्गत प्रश्नांत आपण कोणालाही हस्तक्षेप करू दिलेला नाही. पण पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अंतर्गत मुद्द्यावर चर्चा आहे.”
दरम्यान, भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव वाढलेला असताना शरद पवार यांना या संघर्षाबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, “यामध्ये जास्त बोलायचे नसते तर थेट ॲक्शन घ्यायची असते.” यावेळी त्यांच्या विधानातून भारतातील विरोधी पक्षांनी संयमीपणा दाखवत केंद्र सरकारला एकमताने पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले.