पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवताना आरक्षण रद्द होणार नसल्याची ग्वाही दिली. काँग्रेसकडून सध्या देशभरात खोटी प्रचार मोहीम सुरू असून देशातील जनतेत फूट पाडण्यासाठी काँग्रेस दलितांच्या प्रश्नाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दलितांच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. जेथे जाईल तिथे त्यांच्याकडून मोठ्या आवाजात खोटा प्रचार केला जात आहे. दलितांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांना मुर्ख बनविण्यासाठी काँग्रेसकडून ही खोटी प्रचार मोहीम राबविली जात असल्याचे मोदींनी सांगितले.
देशातील जनतेत फूट पाडण्यासाठी जाणुनबुजून हा वाद निर्माण करण्यात आला आहे. हातातून सत्ता गेल्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे. दलित नेहमी आपलेच मतदार राहतील असे त्यांना वाटायचे. मात्र, आता त्यांच्यासाठी मोदी काम करत आहे. त्यामुळे मोदीचे काय करायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. दलितांनी मोदींना पाठिंबा देऊ नये, असे त्यांना वाटते. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता टीका केली असली तरी त्यांच्या टीकेचा मुख्य रोख काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुल्लाच्या हत्येच्या निषेधार्थ राहुल गांधी विद्यार्थ्यांबरोबर उपोषणाला बसले होते.