मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल तक्रारीची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत न घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे गिरगाव न्यायालयात हजर राहावे लागण्यापासून राहुल यांना पुन्हा दिलासा मिळाला भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात २०१९ मध्ये गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करून राहुल गांधी हे मोदींसह पक्षालाही बदनाम करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. श्रीश्रीमल यांच्या तक्रारीची दखल घेऊन गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना समन्स बजावले होते व न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राहुल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठासमोर राहुल यांची याचिका सोमवारी सुनावणीसाठी आली. त्या वेळी न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २० जानेवारी रोजी ठेवली. तसेच गिरगाव न्यायालयाने राहुल यांच्याविरोधातील तक्रारीवर २५ जानेवारीपर्यंत कारवाई करू नये, असे आदेश दिले.