Operation Sindhu Israel Iran conflict : इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. एकीकडे इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले होत असताना इराणकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. या संघर्षादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेहरानहून अर्मेनिया येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेल्या ११० विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान गुरूवारी पहाटे दिल्लीत दाखल झाले आहे. गेल्या शुक्रवार पासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव वाढला असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना तेहरानमधून बाहेर काढले जात होते आणि त्यापैकी ११० विद्यार्थ्यांना मंगळवारी ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत भारतीय दूतावासाच्या मदतीने सीमा ओलांडून आर्मेनियामध्ये आणण्यात आले होते.

११० विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान दिल्लीत उतरले, यानंतर जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय एस जयशंकर यांचे ऑपरेशन सिंधू सुरू केल्याबद्दल आभार मानले . युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे.

“आम्ही आशावादी आहोत की सर्व उर्वरित विद्यार्थ्यांना देखील लवकरच बाहेर काढले जाईल,” असे विद्यार्थी संघटनेने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

माझ हैदर या इराणमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याचे वडील हैदर अली म्हणाले की, “आम्ही खूप आनंदी आहोत. विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या घरी परत आणण्यात आले. यासाठी आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. पण जे विद्यार्थी तेहरानमध्ये अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यात आले नाही त्यांच्यासाठी आम्ही दु:खी आहोत,” असे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

भारत सरकारने इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध भडकण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बुधवारी ‘ऑपरेशन सिंधू’ जाहीर केले आहे. भारताने नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केल्यानंतर इराणच्या दुतावासान सांगितले काही भारतीय विद्यार्थी इस्त्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत आणि इराणचे परराष्ट्र मंत्रालय भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

बुलंदशहर येथील रहिवासी परवेझ आलम हे समीर आलम या त्यांच्या मुलाची विमानतळावर वाट पाहत होते, त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की “गेल्या दोन वर्षांपासून तो उर्मिया येथे शिक्षण घेत आहे. सर्वकाही ठीक होतं पण सध्या परिस्थिती बिघडली आहे. आम्ही खूप तणावाखाली होतो. पण भारत सरकारने विद्यार्थ्यांना आर्मेनिया येथे हालवले आणि तेथे त्यांना चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले. आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत.”

११० विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या मीर खालिफ याने इराणमधील तणावाच्या स्थितीबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की, “आम्ही क्षेपणास्त्रे पाहू शकत होतो. तेथे युद्ध सुरू होते. आमच्या भागात देखील बॉम्बस्फोट झाला. आम्हाला परिस्थितीची खूप भीती वाटत होती. मला आशा आहे की आम्हाला ते दिवस पुन्हा पहावे लागणार नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.