रियाध,जाकार्ता, सौदी अरेबिया, इटली, इंडोनेशिया या सर्व देशांनी बुधवारी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिला. पाकिस्तानस्थित दहशतवादाविरोधात आपण भारताबरोबर असल्याचे सौदी अरेबियाने स्पष्ट केले. इटलीने द्विपक्षीय सहकार्य देऊ केले तर भारताला दहशतवादाविरोधातील शक्य त्या सर्व व्यासपीठांवर आपला पाठिंबा असल्याचे इंडोनेशियाने सांगितले. दहशतवादाविरोधात ‘शून्य सहिष्णूते’ची भूमिका घेण्याच्या भारताच्या धोरणाची दक्षिण आफ्रिकेने प्रशंसा केली. फ्रान्सनेही या मुद्द्यावर आपण भारताबरोबर असल्याचे स्पष्टपणे सांगितले
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांचा दौरा करत आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २२ एप्रिलला केलेल्या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने कोणत्या परिस्थितीत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केली हे जागतिक नेत्यांना पटवून देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ३३ देशांच्या राजधान्यांनाही भेट दिली जात आहे. सौदी अरेबिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फ्रान्स, पनामा या देशांमधील भारतीय दूतावासाने विविध भेटींची एक्सवरून माहिती दिली.
दहशतवादाबद्दल भारताची भूमिका जगाला मान्य – जयशंकर
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या जनतेचे दहशतवादाविरोधात संरक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराला विविध देशांनी पाठिंबा दिला आहे असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले.