Operation Sindoor: अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान आणि काश्मीरबाबत केलेल्या विधानांवर भारताने आज स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानबरोबरचे प्रश्न दोन्ही देश मिळून सोडवतील, यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. भारताच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवावा अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. ते पुढे म्हणाले की, तुम्हाला माहिती आहेच की, हे प्रलंबित प्रकरण फक्त पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभागाच्या रिकामा करण्याबद्दल आहे.
दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्या परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखती विजयाचा दावा केला होता. याला फटकारताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल म्हणाले की,”विजयाचा दावा करणे ही त्यांची जुनी सवय आहे. त्यांनी १९७१, १९७५ आणि १९९९ च्या कारगिल युद्धातही असेच केले होते. पाकिस्तानला ढोल वाजवण्याची जुनी सवय आहे. पराभूत झाले तरी ते ढोल वाजवतात.”
रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, “तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उपग्रह छायाचित्रे व्यावसायिकरित्या उपलब्ध असतात. मी तुम्हाला विनंती करतो की पाकिस्तानने भारतात ज्या ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केला आहे त्या ठिकाणांकडे पहा. या ठिकाणांशी आणि पाकिस्तानातील ठिकाणांशी तुलना करा ज्यांना आम्ही यशस्वीरित्या लक्ष्य केले आणि नष्ट केले. त्यानंतर कोणी विजय मिळवला याचे तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळेल. विजयाचा दावा करणे ही त्यांची जुनी सवय आहे.”
“गेल्या आठवड्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानातील बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद आणि इतर ठिकाणांवरील दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. याचबरोबर आम्ही त्यांची लष्करी क्षमता लक्षणीयरीत्या कमी केली असून, त्यांचे प्रमुख हवाई तळही निष्क्रिय केले आहे. जर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना हे त्यांचे यश आहे असे वाटत असेल तर त्यांचे स्वागत आहे”, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.