Kerala community in Dubai: दुबईमधील केरळी समुदायाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केल्यानंतर सोशल मीडियावर नाराजी पसरली आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबविल्याच्या दरम्यान शाहिद आफ्रिदीने अनेकदा भारताविरोधात गरळ ओकली होती. तरीही केरळी समुदायाने त्याला आमंत्रित करून आदरातिथ्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

दुबईत केरळमधील अनेक लोक राहतात. या समुदायाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे आदरातिथ्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आफ्रिदी आल्यानंतर उपस्थितांनी त्याचे जोरात स्वागत केले. तसेच आफ्रिदीने या कार्यक्रमात भाषणही केले. ज्यात म्हटले की, भारतातील केरळचा भाग आणि तेथील जेवण मला खूप आवडते.

आफ्रिदी कार्यक्रमस्थळी येताच तेथे सुरू असलेला सांस्कृतिक कार्यक्रम थांबविण्यात आला. तसेच उपस्थितांनी ‘बूम, बूम’ असा जयघोष करत आफ्रिदिचे स्वागत केले. आफ्रिदी धडाकेबाज फलंदाजी करत असल्यामुळे त्याला बूम, बूम आफ्रिदी असे नाव पडले होते. “होगया बूम बूम”, असे म्हणत आफ्रिदीनेही उपस्थितांना प्रतिसाद दिला.

पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदीचे वादग्रस्त विधान

भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर आफ्रिदीने भारताविरोधात विधाने केली होती. एप्रिल महिन्यात पाकिस्तानमधील समा टीव्हीशी बोलत असताना त्याने म्हटले, “भारतात फटाके जरी वाजले तरी पाकिस्तानकडे बोट दाखविले जाते.” तसेच पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हे भारतीय सैन्यदलाचे अपयश असल्याचेही आफ्रिदी म्हणाला होता.

आफ्रिदी म्हणाला, “जम्मू-काश्मीरमध्ये आठ लाखांचे सैन्यदल आहे. तरीही हल्ला कसा होतो? याचा अर्थ ही फौज लायक नाही. तुम्ही लोक कामाचे नाहीत. तुम्ही तुमच्याच लोकांना सुरक्षाही पुरवू शकत नाहीत का?” याशिवाय आफ्रिदीने भारतीय माध्यमांचीही खिल्ली उडवली होती. भारतातील माध्यमांनी सीमेवरील तणावाला बॉलिवूडच्या चित्रपटासारखे समजले असावे, असेही विधान त्याने केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

सोशल मीडियावर आफ्रिदीच्या आदरतिथ्यावर टीका केली जात आहे. केरळी समुदायाने भारताविरोधी गरळ ओकणाऱ्या आफ्रिदीला बोलावून चूक केली, असे लोक म्हणत आहेत. तसेच ही संतापजनक घटना असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. एका युजरने म्हटले की, केरळमध्ये साक्षरतेचा दर १०० टक्के आहे, असे सांगितले जाते. पण अशी साक्षरता काय कामाची?