Peter Navarro : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणि २५ टक्के आणि त्यानंतर आणखी २५ टक्के असं एकूण ५० टक्के टॅरिफ लावणाचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. टॅरिफच्या मुद्द्यामध्ये काहीतरी सुवर्णमध्य निघेल अशी अपेक्षा भारताला होती. मात्र, आता परत एकदा अमेरिकेने चीनचा उल्लेख करत भारताला पुन्हा इशारा दिला. त्यानंतर आता पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताने आमची फसवणूक केली म्हणत भारतावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
पीटर नवारो यांचे आरोप नेमके काय?
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणापासून भारताने आपल्या ऊर्जा खरेदीमध्ये बदल केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी भारत रशियन तेल खरेदी करत नव्हता. मात्र, भारत आता आपल्या गरजेपैकी ३५ टक्के तेल रशियातून खरेदी करत आहे. तसंच व्यापारात भारताने अमेरिकेची फसवणूक केली आहे. रशियाबरोबरच्या तेल व्यापारातून भारत नफा कमवत असल्याचा आरोपही नवारो यांनी केला आहे.
भारताकडून स्वस्त रशियन तेल खरेदी केलं जातं आणि..
भारताच्या रिफायनिंग कंपन्या रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल खरेदी करत आहेत आणि त्याचे डिझेल व पेट्रोलसारख्या उत्पादनांमध्ये रूपांतर करत आहेत आणि नंतर ते परदेशात जास्त नफ्याने विकत आहेत. “भारताकडून स्वस्त रशियन तेल खरेदी केलं जातं आणि नंतर त्याद्वारे उत्पादित केलेले डिझेल व पेट्रोल युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये जास्त दराने विकतात. हा पूर्णपणे भारतीय शुद्धीकरण उद्योगाचा नफा कमवण्याचा व्यवसाय आहे. आमची भारताने फसवणूक केली आहे. असा गंभीर आरोपही नवारो यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल. “रशियन सरकार कच्च्या तेलाच्या विक्रीतून मिळालेल्या त्या पैशाचा वापर शस्त्रे बनवण्यासाठी आणि युक्रेनियन लोकांना मारण्यासाठी करतात. त्यामुळे अमेरिकेला युक्रेनियन नागरिकांना अधिक मदत आणि लष्करी उपकरणे पुरवावी लागतात. हे मूर्खपणाचे आहे.” असंही नवारो म्हणाले.
पीटर यांच्या आरोपांच्या फैरी आणखी काय?
भारताला देशांतर्गत अर्थव्यवस्था चालवण्यासाठी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याची गरज आहे हे म्हणणं मूर्खपणाचं आहे.
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करायचं आणि अफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये उच्च किंमतीत रिफाईंड उत्पादने विकायची. ही प्रक्रिया रशियन युद्धयंत्रणेला निधी पुरवणारी आहे. रोज १० लाख बॅरलपेक्षा जास्त तेल विकलं जात आहे.
भारतावर २५ टक्के शुल्क हे रशियाकडून तेल खरेदीमुळे लावण्यात आलं. तर त्यानंतर जे आणखी २५ टक्के शुल्क लावण्यात आलं त्याचं कारण भारत अमेरिकेची घोर फसवणूक करतो आहे.
भारताने हे समजून घेतलं पाहिजे की त्यांचा आर्थिक व्यवहार हा व्यापारापुरता नाही, तर युद्ध आणि शांततेबाबतचाही आहे. शांततेचा मार्ग दिल्लीतून जातो. असं सगळे मुद्दे पीटर नवारो यांनी मांडले आहेत.