पंढरपूरच्या पालखीमार्गाच्या कामाचं पंतप्रधान मोदींनी भूमीपूजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी तुकोबांच्या ओवीचा दाखला देत भागवत धर्माचा महिमा सांगितला. ““या भूमीने संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते. रस्ते हे विकासाचे द्वार असते असं आपण म्हणतो. पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका उंच नेणारे ठरतील,” असं मोदी म्हणाले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म I भेदाभेद भ्रम अमंगळ II१II आईकाजी तुम्ही भक्त भागवत I कराल ते हित सत्य करा II२II कोणाही जीवाचा न घडो मत्सर I वर्म सर्वेश्वर पूजनाचे II३II तुका म्हणे एका देहाचे अवयव I सुख दु:ख जीव भोग पावे II४II या ओळी मराठीतून म्हणत पंतप्रधान मोदींनी भागवत धर्माचा महिमा सांगितला. “मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते. अषाढी एकादशीचे विहंगम दृश्य कोणीच विसरू शकत नाही. हजारो-लाखो भाविक वारीत सहभागी होतात. शेवटी सर्व पंथ हे भागवत पंथच आहेत,” असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं. ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना भगवान विठ्ठलापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. माझं पंढरपूरशी विशेष नातं आहे. भगवान द्वारकाधीश इथे येऊन विठ्ठल रुपात विराजमान झाले. दुसरं नातं म्हणजे माझं काशीशी नातं आहे आणि पंढरपूर हे आमच्यासाठी दक्षिण काशी आहे,” असं मोदी म्हणाले. “या भूमीने संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील,” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.