पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन; योजनेचे उद्घाटन देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडल्यामुळे हे क्षेत्र विकासाचे इंजिन होणार आहे. सामान्य नागरिकाला अतिशय कमी किमतीत विमान प्रवास करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब उडे, सब जुडे’चा नारा दिला आहे. शिमला येथील जुब्बरहाटी विमानतळावर शिमला ते दिल्ली या विमानाला हिरवा झेंडा दाखवून ‘उडान’ या योजनेचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. ‘उडान’च्या (उडे देश ना आम नागरिक) माध्यमातून हवाई चप्पल घालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवास शक्य व्हावा, हेच आमचे ध्येय असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले या योजने अंतर्गत गुरुवारपासूनच कडप्पा ते हैदराबाद आणि नांदेड ते हैदराबाद विमानसेवेचे मोदींनी उद्घाटन केले. तसेच लवकरच मुंबई ते नांदेड यादरम्यान विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मोदींनी यावेळी केली. हवाई प्रवास हा सुरुवातीला राजा महाराजा यांच्यासाठी असे. एअर इंडियाचाही लोगोही ‘महाराजा’ असा होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी तत्कालीन नागरी हवाई परिवहनमंत्री राजीव प्रताप रुडी यांना ‘महाराजा’ ऐवजी कॉमन मॅनचे चित्र का लावले जात नाही, अशी विचारणा केली होती. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. शिमला येथे टॅक्सीने जाण्यासाठी प्रतिकिलोमीटर १० रुपये खर्च येतो. तसेच त्यासाठी जवळपास ९ तास खर्ची करावे लागतात. मात्र आता उडानमुळे हवाई प्रवास यापेक्षा कमी दरात करणे शक्य असून, वेळेतही मोठी बचत होणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. काय आहे उडान योजना? विमान प्रवासाचा खर्च प्रति तास २५०० रुपयांपर्यंत मर्यादित करणारी उडान ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत ५०० किलोमीटपर्यंतचा विमान प्रवास फक्त २५०० रुपयांपर्यंत करता येणार आहे. देशातील ७० विमानतळे उडान अंतर्गत जोडली गेल्यामुळे सर्व क्षेत्रांना त्याचा फायदा होणार आहे.