पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी ‘मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो’ असं विधान केलं होतं. यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. शरद पवार हे सभागृहाचे वरिष्ठ नेते असून मी त्यांना नेहमी आदरणीय मानतो, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. ते राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर चौफेर टोलेबाजी केली आहे. तसेच काँग्रेसने १९८० साली शरद पवारांचं सरकार पाडलं, अशी टीकाही त्यांनी केली.

नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी कलम-३५६ चा (राष्ट्रपती राजवट) ५० वेळा वापर केला. त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं, त्या पंतप्रधानांचं नाव होतं, श्रीमती इंदिरा गांधी… त्यांनी ५० वेळा विविध राज्यातील सरकारं पाडली. केरळमध्ये सगळ्यात आधी डाव्या पक्षाचं सरकार स्थापन झालं होतं. पण याला पंडित नेहरू पसंत करत नव्हते. त्यानंतर काही दिवसांतच हे निवडून आलेलं सरकार पाडलं. डाव्या पक्षांना टोला लगावत मोदी पुढे म्हणाले, “आज तुम्ही तिथे उभे आहात, पण तुमच्यासोबत काय झालं होतं, ते आठवा…”

हेही वाचा- “मविआ सरकार कोसळण्याला पटोले जबाबदार” म्हणणाऱ्या शिवसेनेला काँग्रेसचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आघाडीच्या धर्माला…”

काँग्रेसने विविध राज्यात पाडलेल्या सरकारचा उल्लेख करताना मोदी पुढे म्हणाले, “तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांच्यासारख्या दिग्गजांचं सरकारही याच काँग्रेसवाल्यांनी बरखास्त केलं होतं. एमजीआर यांचा आत्मा वरून पाहत असेल की तुम्ही कुणाच्या बाजुने उभे आहात.”

हेही वाचा- “नेहरुंच्या वारसदारांना त्यांचं आडनाव लावण्यास…”, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना खोचक सवाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांना उद्देशून मोदी म्हणाले, “या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य तिथे मागे बसले आहेत. मी त्यांना नेहमी एक आदरणीय नेता मानतो, त्यांचं नाव श्रीमान शरद पवार… १९८० मध्ये शरद पवारांचं वय ३५ ते ४० वर्षे होतं. एक नवखा मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करायला निघाला होता. पण त्यांच्या सरकारला काँग्रेसने पाडलं. आज तेही काँग्रेसच्या बाजुने आहेत. प्रत्येक प्रादेशिक नेत्यांना काँग्रेसने त्रास दिला आहे. एनटीआर यांच्यासोबत काय झालं? ते जेव्हा उपचारासाठी अमेरिकेत गेले, त्याचवेळी काँग्रेसने एनटीआरचं सरकार पाडलं, ही काँग्रेसची राजनीती आहे,” अशी जोरदार टीका नरेंद्र मोदींनी केली.