Operation Sindoor India Pakistan News Updates पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांना ठार केलं. या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे समजल्यानंतर जगाने या घटनेचा निषेध नोंदवला. त्यानंतर भारताने ६ तारखेच्या मध्यरात्री आणि ७ मेच्या पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक राबवत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ अड्डे उद्ध्वस्त केले. या सगळ्यानंतर तीन दिवस म्हणजेच १० मे पर्यंत हा संघर्ष सुरु होता. पाकिस्तानने आगळीक केली की त्यांना जशास तसं उत्तर दिलं जात होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं आणि ही कारवाई किती घातक होती ते सांगितलं.

पाकिस्तानचा भेसूर चेहरा पाहिला-नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर राबवत असताना आपल्या देशाने आणि जगाने पाकिस्तानचा तो भेसूर चेहरा पाहिला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी गेले होते. दहशतवादी देश असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. भारत आणि भारताच्या नागरिकांना कुठल्याही संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. युद्धात आपण कायमच पाकिस्तानला धूळ चारली आहे. आता ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाईचे नवे आयाम आपण आखले आहेत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान पाकिस्तानशी चर्चा फक्त दोनच मुद्द्यांवर होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद या दोनच मुद्द्यांवर पाकशी चर्चा-नरेंद्र मोदी

“भारत आता दहशतवाद मुळीच सहन करणार नाही. पाकिस्तानचं सरकार दहशतवाद्यांना ज्या प्रकारे पोसतं आहे त्यावरुन हे दिसतं आहे की हे दहशतवादीच एक दिवस पाकिस्तानला संपवतील. पाकिस्तानला त्यांचा दहशतवादी ढाचा उद्ध्वस्त करावा लागेल. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज मी सगळ्या जगाला सांगतो जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया बंद करणं या दोन मुद्द्यांवरच होईल.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानला मोदींनी कोणते तीन इशारे दिले?

पहिला इशारा – यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देणारच. दशतवादाची मूळं जिथे गाडली आहेत त्याच भागांवर आम्ही कारवाई करणार

दुसरा इशारा– कोणतंही आण्विक ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. त्याचा आधार घेऊन वाढणाऱ्या दहशतवादावर भारत घातक हल्ला करणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरा इशारा– आपण दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशतवाद्यांचे म्होरके यांना वेगळं मानणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगानं पाकिस्तानचं ते निंदनीय सत्य पाहिलं आहे जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे मोठमोठे अधिकारी उपस्थित होते. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. आपण भारत आणि भारतीय नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नव्या पद्धतीला सुरुवात केली आहे. आपण वाळवंट व डोंगराळ भागात आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्याचबरोबर न्यू एज वॉरफेअरमध्ये आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. या मोहिमेत आपल्या भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता सिद्ध झाली आहे. आज जग पाहात आहे की २१ व्या शतकाती युद्धनीतीत भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची वेळ आली आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपल्या सगळ्यांचं एकत्र राहणं, आपली एकता आपली सर्वात मोठी शक्ती आहे. नक्कीच हे युग युद्धाचं नाही. पण हे युग दहशतवादाचंही नाही.