रमणगरा शहरानजीक असलेल्या अवरहल्ली येथील श्री रेवण्णा सिद्धेश्वर स्वामी मंदिराचे पुजारी विजय कुमार (३७ वर्षीय) एका धार्मिक विधीदरम्यान जळते निखारे असलेल्या अग्निकुंडात पडून गंभीर जखमी झाले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने तीन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यापैकी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी विजय यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा त्याचा भाऊ मंजुनाथही भाजल्यामुळे जखमी झाला आहे.

विश्वस्त मंडळाने आयोजित केलेल्या या महोत्सवात १५ फूट लांबीचे अग्निकुंड होते. या अग्निकुंडात चालण्याचा धार्मिक विधी करण्यासाठी विजय उतरले आणि त्यावेळी ते अग्निकुंडात घसरले. यावेळी अग्निकुंडात जळते निखारे असल्यामुळे विजयला गंभीर दुखापत झाली. अग्निकुंडाच्या भोवतालच्या परिसरात अनेक लोक हा विधी पाहण्यासाठी आणि विजयला प्रोत्साहन देण्यासाठी उभे होते. त्यामध्ये मंजुनाथही उपस्थित होता. विजय अग्निकुंडात घसरलेला पाहून विजयला वाचवण्यासाठी अग्निकुंडात उतरला. या दरम्यान त्यालाही दुखापत झाली.

त्या दोघांना लगेचच रमणगरा येथील रूग्णालयात आणि त्यानंतर बंगळुरूच्या सेंट जॉन रूग्णालयात दाखल करण्यात आले. मंजुनाथच्या पायाला जखमा झाल्या आहेत, तर विजयच्या पावलांना, छातीला आणि हाताला दुखापत झाली आहे. मात्र, दोघेही सुखरूप आहेत. काळजीचे कारण नाही, असे मंदिराच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, रमणगरा पोलिसांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. गेल्या २ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. ११ एप्रिलला कनकपुरा येथे ३५ वर्षीय रवी पुजारी हे मरम्मा देवीच्या उत्सवादरम्यान निखाऱ्यांवर पडले होते. १५ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या घटनेत सतनूर येथील मरम्मा देवी मंदिरात तशीच घटना घडली होती. मात्र, या घटनेतील पुजारी दुखापतीतून पूर्ण बरे झाल्याची माहिती आहे.