पाकिस्तानच्या कैदेतील भारतीय नागरिक सरबजितसिंग याच्या हत्येचे पडसाद भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांवर उमटल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे या हत्येस कारणीभूत असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांतर्फे करण्यात आली आहे.
सरबजितवरील हल्ल्याची पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी कठोर शब्दांत निंदा केली आहे. सुमारे २२ वर्षे, ८ महिने आणि ३ दिवस पाकिस्तानी कैदेत राहिल्यानंतर भारतात परतणारा सरबजित आपल्या कुटुंबाला साधे पाहूही शकला नाही, अशा शब्दांत एक्स्प्रेस ट्रिब्यून या दैनिकाने आरोप केला आहे. ‘ट्रिब्यून’ने आपल्या अग्रलेखात किमान राजनैतिक संबंध टिकविण्यासाठी तरी यावेळी पाक सरकार या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करेल, अशी आशा या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.