ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत आता भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. एक फोटो पोस्ट करुन त्यांनी राहुल गांधींवर ही टीका केली आहे. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे.

काय आहे अमित मालवीय यांची पोस्ट?

अमित मालवीय यांनी एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात अर्धा फोटो राहुल गांधींचा आहे तर अर्धा फोटो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा आहे. हा फोटो पोस्ट करत राहुल गांधी पाकिस्तानचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे. अमित मालवीय म्हणाले आहेत की, “आश्चर्य वाटावं असं काहीही नाही कारण राहुल गांधी पाकिस्तानचं हित जपत आहेत आणि त्यांचाच अजेंडा चालवत आहेत. राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं नाही. त्यामुळे भारताबाबत त्यांना काय वाटतं हे दिसून येतंच.” असाही टोला अमित मालवीय यांनी लगावला आहे.

पाकिस्तानची किती विमानं पाडली हे राहुल गांधी का विचारत नाहीत?

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी अनेकदा विचारतात की भारताने किती लढाऊ विमानं गमावली, पण त्यांनी एकदाही विचारलेलं नाही की पाकिस्तानची किती लढाऊ विमानं आपण पाडली? भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हल्ला करुन काय काय कारवाई केली? हे राहुल गांधी कधीच विचारत नाहीत. राहुल गांधींच्या समोर काय आहे? निशान ए पाकिस्तान का? असाही प्रश्न अमित मालवीय यांनी विचारला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं होतं?

राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. ते म्हणाले होते, ऑपेरशनच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला कळवणं हा गुन्हा आहे. परराष्ट्र मंत्र्यांनीच जाहीर केलंय की भारत सरकारने पाकिस्तानला सांगितलं होतं. त्यांना कोणी अधिकार दिला? पाकिस्तानला कळवल्यामुळे आपण किती भारतीय विमाने गमावली? असाही प्रश्न त्यांनी विचारला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय आहे. मी पुन्हा विचारेन की पाकिस्तानला या हल्ल्याविषय़ी माहिती होती, त्यामुळे आपण आपले किती भारतीय विमाने गमावली आहेत? ही चूक नाहीय तर हा गुन्हा आहे. त्यामुळे देशाला खरं काय ते कळलं पाहिजे” असं राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर आता पाकिस्तान आणि राहुल गांधी यांचा अजेंडा एकच आहे अशी टीका भाजपाने केली.