लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे कोणता नेता कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार, याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्याबाबत आता नवे वृत्त येत आहे. ते यावेळी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता नाही. त्याऐवजी ते उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघासह तेलंगाणा किंवा कर्नाटकमधील आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी २०१९ सालची निवडणूक वायनाड आणि अमेठी येथून लढवली होती. त्यांचा वायनाडमध्ये विजय तर अमेठीतून पराभव झाला होता. त्यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीमधून पराभूत केले होते.

सीपीआय, आययूएमएलमुळे काँग्रेस अडचणीत

इंडियन युनियम मुस्लीम लीगचे (आययूएमएल) केरळमध्ये एकूण दोन खासदार आहेत. मात्र या पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तीन जागांची मागणी केली जात आहे. आययूएमएल या पक्षाला मुस्लीम मते मिळण्याचे प्रमाण अधिक आहे. वायनाड या मतदारसंघात मुस्लिमांचे प्रमाण लक्षणीय असून या पक्षाकडून वायनाड या जागेची मागणी केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसवर दबाव आला असून राहुल गांधी हा मतदारसंघ सोडून कर्नाटक किंवा तेलंगाणा येथील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात.

सीपीआयने उभा केला उमेदवार

कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) केरळमध्ये एकूण चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये वायनाड या जागेचाही समावेश आहे. राज्यपातळीवर सीपीआय हा पक्ष लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एलडीएफ) भाग आहे. तर याच पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत समावेश आहे. असे असताना सीपीआयने वायनाड या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केल्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. सीपीआयच्या वरिष्ठ नेत्या अन्नी राजा यांना सीपीआयने वायनाडमधून तिकीट दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार का?

दुसरीकडे राहुल गांधी यावेळी पुन्हा एकदा अमेठीसह तेलंगणा किंवा कर्नाटक या दोन राज्यांतील आणखी एका जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर सहमती झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, या सर्व शक्यता असून राहुल गांधी यांनी मात्र निवडणूक लढवण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. नुकतेच राहुल गांधी अमेठीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनवारून भाजपाला लक्ष्य केले. तर प्रत्युत्तरादाखाल स्मृती इराणी यांनीदेखील ‘राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अमेठीत आले. मात्र त्यांच्या स्वागतासाठी कोणीही नव्हते. रस्ते रिकामेच होते. राम मंदीर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्यांबद्दलचा जनतेचा रागच यातून दिसतोय. गांधी कुटुंबाने रायबरेलीचीही जागा आता सोडली आहे,’ अशी टीका राहुल गांधींवर केली.