Rahul Gandhi : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. २७ निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळीबार केला आणि त्यातल्या पुरुष पर्यटकांना ठार केलं. या घटनेमागे पाकिस्तान आहे ही बाब उघड झाल्यानंतर मोदी सरकारतर्फे ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं आहे. या ऑपरेशन सिंदूरवरुन आता राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यात मी शस्त्रविराम घडवून आणला. पंतप्रधान नरेंंद्र मोदी चकार शब्दही बोलत नाहीत. याचा अर्थ दाल में कुछ काला है असं म्हणत राहुल गांधींनी टीका केली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
“ऑपरेशन सिंदूर संपेललं नाही असंही पंतप्रधान सांगतात आणि आपण विजयी झालो असंही सांगतात. तिकडून ट्रम्प सांगतात की ऑपरेशन सिंदूर मी संपुष्टात आणलं. २५ वेळा बोलले आहेत. त्यामुळे दाल में कुछ काला है. आपल्या परराष्ट्र धोरणाची या लोकांनी खिल्ली उडवली. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविराम घडवून आणला आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे. पंतप्रधान तोंडाने कबुली देणार आहेत का? ते कधीच हे सत्य सांगणार नाहीत. हा फक्त शस्त्रविरामाचा प्रश्न नाही इतर सगळ्या समस्या आहेत. जे स्वतःला देशभक्त म्हणवतात ते पळून गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा सांगितलंय की मी शस्त्रविराम घडवून आणला. डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत हे सांगणारे? पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदाही उत्तर दिलं नाही. ते बोलले नाहीत म्हणून सत्य बदलणार आहे का?” असं म्हणत राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरवरुन टीका केली आहे.
चर्चेची मागणी त्यांनी मान्य केली आहे आता पुढे काय होतं पाहू-राहुल गांधी
या सगळ्यावरुन आम्ही चर्चेची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी मान्य केली आहे. पंतप्रधान आल्यानंतर चर्चा केली जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आता कधी चर्चा घडवून आणली जाते ते बघू. मात्र या सगळ्या समस्यांवर आणि ऑपरेशन सिंदूरवर आम्हाला चर्चा हवी आहे. कारण देशात हे प्रश्न कायम आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.