भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या शेजारी देशांना चीनकडून मिळणाऱ्या कर्जासंदर्भात इशारा दिलाय. चीनचा थेट उल्लेख न करताना जयशंकर यांनी कर्ज धोरणामध्ये अडकू नका असं म्हटलंय. चीनकडून मिळणारी आर्थिक मदत स्वीकारण्याआधी त्याबद्दल योग्य ती माहिती करुन घ्या. कर्ज घेण्याआधी त्याचे फायदे आणि नुकसान याची आकडेमोड करुनच पुढील निर्णय घ्या. भारताने हा सल्ला म्यूनिख येथील सुरक्षा परिषदेमधील एका चर्चेदरम्यान दिलाय.
परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा तेव्हा दिला जेव्हा बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मेमन यांनी त्यांच्या देशामध्ये मूलभूत प्रकल्प उभारण्यासाठी निधीची गरज असून चीन भरपूर आर्थिक मदत करण्यास तयार असल्याचा उल्लेख केला. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीन फारच कमी अटींवर सहज निधी उपलब्ध करुन देण्यास तयार असल्याचं सांगितलं. इतर देश कर्ज देताना बऱ्याच अटी ठेवत आहेत, असंही बांगलादेशच्या मंत्र्याने सांगितलं. यावर जयशंकर यांनी अंतरराष्ट्रीय संबंध फारच स्पर्धात्मक झाले आहेत असं मत व्यक्त केलं. “प्रत्येक देश योग्य वेळेची वाट पाहत असतो. आपण कसे पुढे जाऊ शकतो हेच प्रत्येक देश बघत असतो. नेहमीच सर्वच राष्ट्रांच्या डोक्यामध्ये इतर राष्ट्रांना मदत करताना स्वत:चा फायदा करुन घेण्याचा पहिला उद्देश असतो. आपण हे काम केलं तर त्यामधून आपला काय फायदा होणार याचाच प्रत्येक देश विचार करतो,” असं जयशंकर म्हणाले.
कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेले अनेक देश आपण पाहिलेत असा उल्लेखही जयशंकर यांनी केला. यापैकी अनेक देश हे आशियामध्येच आहेत असंही जयशंकर म्हणाले. या देशांनी कर्ज घेऊन असे प्रकल्प उभे केले जे व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी ठरले नाहीत. अशी विमानतळं तयार केली जिथे एकही विमान उतरत नाही. अशी बंदरं बांधली जिथे एकही जहाज आलं नाही. मला वाटतं चीनच्या कर्जाच्या जाळ्यात आडकण्याआधी देशांनी एका स्वत: विचार करणं गरजेचे आहे की ते काय करत आहेत आणि कशासाठी करत आहेत, असंही जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. अयशस्वी प्रकल्पाच्या कर्जाच्या बदल्यात त्या देशांना प्रकल्पामधील हिस्सेदारी द्यावी लागते. अशावेळी सुरुवातीला जो विचार करुन कर्ज घेतलेलं ते हे नाहीच याची जाणीव होते, असंही जयशंकर यांनी सांगितलं.
चीन भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे. आपल्या मित्र देशासाठी म्हणजेच पाकिस्ताननसाठीही चीनने मोठी आर्थिक मदत केलीय. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअर तयार करण्यासाठी चीनने पुढाकार घेतलाय. श्रीलंकेमधील हंबनटोटा आणि कोलंबो बंदरांवरही चीनने ताबा मिळवलाय. बंगलादेशमधील तीस्ता नदीच्या योजनेसाठी चीनने १ अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलंय.