दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील अविभाज्य भाग असलेला खाद्यपदार्थ म्हणजे सांबार. इडली, डोसा, मेदूवडा या पदार्थांची नावं घेतली की सांबाराची आपोआपच डोळ्यासमोर येते. केवळ दक्षिणेतील लोकांच नाही तर जगभरातील खवय्यांना आपल्या चवीची भूरळ पाडणाऱ्या या सांबाराची ओळख जरी दाक्षिणात्य पदार्थ असली तरी या पदार्थाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांचे वंशज असणाऱ्या शहाजी राजांचे चुलत बंधू संभाजी राजेंच्या नावावरून या पदार्थाचे नाव पडल्याचे लेखी पुरावेही आहेत.
यासंदर्भातील माहिती भारतातील प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यानेच लाइफस्टाइल वाहिनीवरील ‘करीज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात दिली आहे. खाद्यभ्रमंती तसेच पाककृतीसंदर्भातील अनेक कार्यक्रमांमुळे घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे कुणाल कपूर. मास्टशेफ इंडियाचा परिक्षक म्हणूनही कुणाल लोकप्रिय आहे. सांबाराबद्दल बोलताना कुणाल म्हणतो, ‘आज आपण तूरडाळ वापरून सांबार बनवतो. सांबार पहिल्यांदा कधी बनवला गेला यासंदर्भात अनेक कथा आहेत. मात्र सांबार हा पदार्थ पहिल्यांदा मराठ्यांच्या राजवटीमध्ये बनवण्यात आला. दक्षिणेमध्ये राज्य करत असलेल्या मराठ्यांनी हा खाद्यपदार्थ पहिल्यांदा बनवला आली त्याचा त्या काळचा राजा संभाजी यांच्या नावावरून या पदार्थाला सांबार हे नाव देण्यात आले.’ आज आपण तुरडाळ वापरून सांबार बनवत असलो तरी सर्वात पहिल्यांदा सांबार हा उडदाची डाळ वापरून बनवण्यात आला होता असेही कुणालने सांगितले. पुढे बोलताना तो म्हणतो, ‘त्यामुळे यापुढे कधीही तुम्ही एखाद्या दाक्षिणात्य उपहारगृहामध्ये सांबार खात असाल तर तुम्ही खरं म्हणजे एक मराठमोळा पदार्थ खाताय हे लक्षात ठेवा.’
सांबाराच्या जन्माची आणि नामकरणाची कहाणी
विविध माहितीपट आणि खाद्य क्षेत्रातील जाणकारांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार सांबार हा मराठी पदार्थच आहे यात शंका नाही. यासंदर्भात इतिहासाची पाने चाळून पाहिल्यास अनेक संदर्भा मिळतात. मराठा राजांच्या जेवणात तूरडाळीची आमटी हा मुख्य अन्नपदार्थ होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांनी तंजावूरपर्यंत मराठी राज्याचा विस्तार केला. त्यांचेच वंशज असणाऱ्या शहाजी राजांनी पुढे तेथील सत्ता संभाळली. शहाजींच्या कारकिर्दीतच पहिल्यांदा सांबार बनविण्यात आल्याचे संदर्भ तामिळ साहित्यात सापडतात. एकदा शहाजी यांनी त्यांचे चुलत बंधू संभाजी यांना मेजवानीसाठी आमंत्रण दिले होते. त्यावेळीच मुदपाकखान्यातील आमसुल संपल्याने आचाऱ्याने आमटीमध्ये चिंच वापरली. तंजावुरात चिंच मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आमटीची अंबट गोड चव टिकवण्यासाठी आमसुलांऐवजी चिंच वापरण्यात आली. शाही मेजवानीसाठी आलेल्या पाहुण्यांबरोबरच सर्व उपस्थितांना आमटीच्या चवीमधील हा बदल खूपच आवडला. संभाजी राजे हे मेजवानीसाठी आलेले खास पाहुणे असल्याने या पहिल्यांद बनवलेल्या पण खूपच चविष्ट अशा आमटीला संभाजी आमटी असे नाव देण्यात आले. पुढे अपभ्रंश होतं होतं त्या आमटीचे नाव संभाजी सारम, सांभारम आणि आता सांबारम झाले.
मिर्चीही मराठ्यांचीच देणगी
मुळात तूरडाळ ही प्रामुख्याने उत्तर भारतात खाल्ली जाते. मराठा साम्राज्याचा विस्तार दक्षिणेत झाल्याने त्यांनी आपल्या इतर परांपरांबरोबर खाद्य परंपराही दक्षिणेत नेली. यामधूनच दाक्षिणात्यांना पहिल्यांदा तूरडाळीची ओळख झाली. याशिवाय भारताला मिर्चीची ओळख करुन देणारेही मराठेच आहेत. पोर्तुगीज लोकांकडून मराठ्यांना मिर्ची आणि झणझणीत पदार्थांची ओळख झाली. आणि पुढे मराठ्यांनीच या झणझणीतपणाचा प्रसार देशभर केला. आज जगभरात भारतातील तिखट जेवण लोकप्रिय आहे. एकंदरितच सांगाचे झाल्यास भारतीय खाद्यसंस्कृतीवर मराठी माणसाची छाप अगदी स्पष्ट दिसते असचं म्हणता येईल.