भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द काढून टाकावा आणि केवळ ‘भारत’ हे नाव ठेवावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी तिथे याबाबत निर्णय होईल, असे  सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा. त्यासाठी संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राला द्यावेत अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडिया या इंग्रजी नावाऐवजी भारत नाव वापरावं अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती.

दिल्ली येथील रहिवासी असलेल्या नमह नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी काल (दि.३) आणि गेल्या आठवड्यात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण, दोन्हीवेळेस सरन्यायाधीश शरद बोबडे अनुपस्थित असल्यानं सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आलं होतं. अखेर आज न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी तिथे याबाबत निर्णय होईल, असे याचिकाकर्त्याला सांगितले. दरम्यान, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने सध्या सर्वोच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे.