Rajasthan Sexual Exploitation Case: राजस्थानच्या ब्यावर जिल्ह्यात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. हिंदू मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप करत मुस्लीम समुदायातील ११ मुलांना अटक झाली आहे. या प्रकरणात पोलीस अद्याप पुरावे शोधत आहेत. तत्पूर्वी विश्व हिंदू परिषद आणि काही हिंदू संघटना आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी या प्रकरणाला धरून केलेल्या विधानांमुळे तणाव वाढला आहे. हिंदू संघटनांशी संबंध असल्यामुळे मुलींवर अत्याचार झाल्याचे राज्यपाल बागडे यांनी सांगितले. आरोपी मुलांच्या कुटुंबियांना तसेच स्थानिक जामा मशिदीला पाडकाम करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

या प्रकरणात ज्यांची सर्वात पहिली तक्रार आली, त्या कुटुंबियांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटले की, माझ्या पाकिटातून (मुलीचे वडील) दोन हजार रुपये गहाळ झाले होते. याबद्दल मुलीला जाब विचारला असता तिने पैसे घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर आईला तिच्या शाळेच्या बॅगेत मोबाइल आढळून आला. या मोबाइल फोनद्वारे ती एका मुस्लीम मुलाशी बोलत असल्याचे समोर आले. तसेच या मुलीची बहीणही एका मुस्लीम युवकाच्या संपर्कात होती, असे लक्षात आले. दोन्ही मुलींनी सांगितले की, मुस्लीम मुलांनी त्यांचे व्हिडीओ आणि फोटो काढून त्यांना संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.

१६ फेब्रुवारी रोजी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी मुस्लीम युवकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. तसेच आमच्या मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होता, असाही आरोप केला. यानंतर याच परिसरातील आणखी तीन अल्पवयीन मुलींच्या पालकांनीही अशाच प्रकारची तक्रार केली.

या प्रकरणात ११ जणांची अटक झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सज्जन सिंह म्हणाले की, ११ पैकी ३ जणांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. सिंह पुढे म्हणाले की, आरोपींच्या मोबाइलमध्ये आम्हाला पीडित मुलींचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ आढळून आलेले नाहीत. तरीही या फोनची तपासणी करण्यासाठी त्यांना न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच मुलींच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालाचीही पोलिसांना प्रतिक्षा आहे.

दरम्यान महानगरपालिकेने १० आरोपींच्या कुटुंबियांना पाडकामाची नोटीस पाठवली आहे. तसेच स्थानिक जामा मशिदीच्या परिसरातही पाडकाम केले जाणार आहे. यामुळे घाबरलेल्या स्थानिक मुस्लीम समुदायाने आता दिल्लीतील विधी तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले असल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपाल हरिभाऊ बागडे काय म्हणाले?

ब्यावर जिल्ह्यातील प्रकरण समोर आल्यानंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा झुनझुनू जिल्ह्यातील शाळेत सोमवारी एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “या मुलींचे पालक हिंदू संघटनांमध्ये असल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले. भारतात आता हे खपवून घेतले जाणार नाही. जे तुमच्याकडे डोळे रोखून पाहतील, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहा. विटेला दगडाने उत्तर द्या. जे घाबरले त्यांनी धर्म सोडला. जे घाबरले नाहीत, ते आज हिंदू आहेत.”