Shankaracharya Swami Avimukteshwaranand on On Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक देशांनी या हल्ल्याची दखल घेतली. भारतातील अध्यात्मिक क्षेत्रालाही या हल्ल्याचा धक्का बसला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी माध्यमांशी बोलताना हल्ल्यात मृत झालेल्या लोकांप्रती श्रद्धांजली व्यक्त केली. “या हल्ल्यानंतर उत्तराखंडमध्ये चालणाऱ्या चार धाम यात्रेवर विचार केला जात आहे. हल्ल्यामुळे यात्रा बंद करावी, असा विचार केला जात आहे, असे कळते. पण ही यात्रा बंद करू नये” अशी आमची मागणी असल्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले आहेत.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा बंद करणे योग्य होणार नाही. सुरक्षा व्यवस्था पुरवून यात्रा सुरू ठेवली पाहिजे. कुणीतरी आहे जो भारताला आव्हान देत आहे. हिंदू आहे का? असे विचारून मारले जाते. याचा अर्थ हे थेट भारताला, सरकारला आणि आपल्या नेत्यांना आव्हान आहे. सरकारने या आव्हानाला उत्तर दिले पाहिजे. हिंदू धर्माचार्य म्हणून मीही हिंदू धर्मासाठी चिंतित असून आपली सुरक्षा कशी राखली जाईल, यासाठी विचारमंथन सुरू आहे.

सरकार अपयशी ठरले

स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले, “सुरक्षा पुरविण्यात सरकार अपयशी ठरत आहे. हिंदू असल्यामुळे आपल्याला मारले जाते. मारणारा शेकडो किमीवरून त्याच्यासह मोठमोठे शस्त्र घेऊन आला. बाहेरची माणसे आरामात येऊन तब्बल २० ते ३० मिनिटे आमची माणसे मारून निघून गेले. कुठून आले आणि कुठे गेले? याचा काहीच पत्ता लागला नाही. या घटनेवरून कळते की, प्रत्येक हिंदूला आता स्वतःची सुरक्षा स्वतः करावी लागेल. आवश्यकता पडली तर शस्त्र आणि शास्त्रही शिकले पाहिजे आणि शस्त्र बाळगलेही पाहिजे.”

चौकीदार कुठे होता?

“आपल्या घरात आपण चौकीदार ठेवलेला आहे. जेव्हा आपण बाहेर जातो, तेव्हा घरात घडलेल्या घटनेला चौकीदार जबाबदार असतो. पण इथे असे होत नाही. काही लोक म्हणतात, मी चौकीदार आहे. चौकीदाराने त्याचे काम प्रामाणिकपणे केले असते तर असा हल्ला करण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. पण इथे तर हल्लेखोर आले आणि आरामात निघून गेले. मग चौकीदार कुठे होता? चौकीदाराची कुठेच चर्चा होत नाही. आता म्हणत आहेत, आम्ही त्यांना धडा शिकवू वैगरे”, अशी टीका स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केली.

सिंधूचे पाणी अडविण्यासाठी काहीच व्यवस्था नाही

अतिरेकी पाकिस्तानातून आले, असे आता सांगितले जात आहे. तुम्हाला इतक्या लवकर हे कसे कळले, जर आता कळले असेल तर मग घटना घडण्याची आधी का नाही समजले. अतिरेकी पाकिस्तानातून आले असतील तर पाकिस्तानवर तगडी कारवाई केली जावी. पण फक्त सिंधू नदीचे पाणी अडवून चालणार नाही. आपल्या देशात एवढे पाणी साठविण्याचा पर्यायच नाही. मी काही तज्ज्ञांशी बोललो, ते म्हणाले की, सिंधू नदीचे पाणी अडवून ठेवण्यासाठी आपल्याकडे सध्या काहीच व्यवस्था नाही.