शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत शिवसेनेची भूमिका व एकूण निर्णयाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असल्याचे सांगत, या निवडणुकीत शिवसेना ५० ते ६० उमेदवार उतरवत असल्याचे सांगितले. तसेच, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची तयारी देखील करत असल्याचे ते म्हणाले.

पत्रकारपरिषदेत माहिती देताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “ही पवित्र भूमी आमची देखील आहे, जेवढी आपल्या सर्वांची आहे, देशाची आहे. तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की, पाच राज्यात निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेश सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. इथली निवडणूक आणि इथले निकाल देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल याचा निर्णय घेतात. यासाठी संपूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये काय घडतय? याकडे लक्षपूर्वक पाहत आहे.”

तसेच, “मी इथे माझ्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेलो आहे. उत्तर प्रदेश खूप मोठे राज्य आहे. ४०० पेक्षाही जास्त सदस्य संख्या असलेली देशातील सर्वात मोठी विधानसभा इथे आहे. शिवेसेनेने यंदा ५० किंवा ६० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आतापर्यंत जेवढे टप्पे झाले त्यात आमचे जवळपास २० उमेदवार आहेत आणि येणाऱ्या पाच, सहा आणि सातव्या टप्प्यात ३० उमेदवार उभा राहतील. ४०० विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या या राज्यात ५०-६० उमेदवार ही काय फार मोठी संख्या नाही हे मला माहीत आहे. मात्र, हे सर्व उमदेवार अतिशय गांभीर्यपूर्वक लढतील, पक्षाचा विस्तार करण्यासाठी आमचं हे पाऊल आहे.” असं संजय राऊत म्हणाले.

UP election : “आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, बाबाजी आमचे देखील आहेत परंतु…” ; संजय राऊत यांचा योगींवर निशाणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “आमची कोणत्या मोठ्या पक्षाशी आघाडी झालेली नाही. हे खरं आहे परंतु, छोट्या पक्षांसह प्रत्येक भागात ज्यांची ताकद आहे त्यांच्यासोबत मिळून आम्ही निवडणूक लढवत आहोत. मात्र मी तुम्हाला यावेळी हे सांगू इच्छितो की, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही १५ ते २० जागांवर लोकसभा निवडणुकी लढवणार आहोत, त्याची तयारी सुरू आहे आणि आमच्या पक्षाने हा निर्णय घेतला आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही यंदा १०० च्या आसपास लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहोत.”