ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. परवा ते गुजरातमधील साबरमती आश्रमात होते. तर काल म्हणजेच शुक्रवारी ते आधी गुजरातमध्ये आणि नंतर दिल्लीत होते. गुजरातमधील जेसीबी कारखान्याला भेट दिली तेव्हा ते चक्क जेसीबीवरुन आल्याचं चित्र पहायला मिळालं. मात्र एकीकडे जहांगीरपुरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने सुरु असणाऱ्या कारवाईवरुन वाद निर्माण झालेला असताना ब्रिटीश पंतप्रधानांनी अशाप्रकारे या कारवाईचं प्रतिक असलेल्या वाहनासहीत फोटो काढून घेणं हे चुकीचं असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलंय. जॉन्सन यांच्या सल्लागार मंडळाला समजायला हवं होतं असं सांगतानाच शिवसेनेनं यावरुन अप्रत्यक्षपणे केंद्रात सत्तेमध्ये असणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

“भारताकडून कुठल्याही देशाला अथवा समाजाला धोका पोहोचलेला नाही. आताच्या जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार भारत करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले आहे. शीख गुरू तेगबहादूर यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून मोदी यांनी जनतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संदेश देत असताना दिल्लीत धार्मिक तणावाचे वातावरण होते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“जहांगीरपुरा भागातील दंगलीनंतर तेथे जेसीबी लावून, पोलीस यंत्रणा लावून असंख्य बांधकामे तोडण्यात आली. एकाच समुदायाच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी त्या भागात जेसीबी चालविण्यात आले. त्यामुळे देशभरात हाहाकार माजला आहे. या भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर हल्ला झाला व त्यातून दंगल भडकली हे सत्य आहे, पण आतापर्यंत हनुमान जयंतीच्या म्हणून शोभायात्रा कधीच कोठे निघाल्या नव्हत्या. त्या नेमक्या या वेळीच काढण्यात आल्या व दंगली पेटविण्यात आल्या. जहांगीरपुऱ्यातील जेसीबी कारवाई हे भाजपासाठी स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे. ही कारवाई फक्त मुसलमान समुदायाला धडा शिकविण्यासाठी केली हा आक्षेप तितकासा खरा नसावा. कारण असंख्य हिंदूंच्या झोपड्या व व्यवसाय त्याच बुलडोझरने उद्ध्वस्त केले. म्हणजे फटका दोन्ही बाजूंना बसला,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये आहे.

“सध्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी ते गुजरातमध्ये होते. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली. चरख्यावर सूतकताई केली व त्याच दिवशी त्यांनी अहमदाबादमधील एका ‘जेसीबी फॅक्टरी’स भेट दिली. जॉन्सन एका जेसीबीवर चढले व फोटो काढले. जॉन्सन यांना जेसीबी फॅक्टरीत खास नेण्यात आले व उत्सव केला गेला. कारण त्याच वेळी देशभरातील विरोधी पक्ष दिल्लीतील ‘जेसीबी’ कारवाईविरुद्ध आवाज उठवीत होते, याचा काय अर्थ घ्यायचा?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

“गांधींचा आयुष्यभर दुस्वास करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिल्लीतील अत्याचाराचे ‘ब्रॅण्डिंग’ जागतिक पातळीवर केले हाच त्यामागचा अर्थ. जॉन्सन हे साबरमतीत होते त्या वेळी जहांगीरपुरा भागातील जेसीबी कारवाईत महात्मा गांधींच्या अनेक तसबिरी उद्ध्वस्त झाल्याची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. दुसरे असे की, भाजपातील अनेक महत्त्वाचे लोक गोडसे प्रकरणावर मूग गिळून बसतात. गोडसेंच्या उदात्तीकरणास ते पाठिंबा देतात, पण त्याच वेळी परदेशी पाहुण्यांना ओढत-खेचत गांधींच्या साबरमती आश्रमात नेतात व सूत कातायला लावतात, हे आश्चर्यच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“लोहपुरुष सरदार पटेलांचा इतका भव्य पुतळा व स्मारक गुजरातमध्ये उभे केले आहे, तेथे जॉन्सन व अन्य पाहुण्यांना नेले जात नाही. कारण जागतिक पातळीवर गांधी हीच देशाची ओळख आहे. मग ढोंग का करायचे? जॉन्सन हे दिल्लीत असताना दिल्लीसह देशात धार्मिक विद्वेषाचे वातावरण होते. हे पाहून जॉन्सन यांच्या मनात काय विचार आले असतील? चर्चिल यांचा आपल्याला स्वातंत्र्य द्यायला विरोध होता. हे लोक स्वातंत्र्य विकून आणि लुटून खातील असे ते म्हणत. देश स्वतंत्र होताना धार्मिक विद्वेष, हिंसाचाराचे वातावरण होते. हिंदू-मुसलमानांत संघर्ष होता. आज इतक्या वर्षांनंतरही ब्रिटनचे पंतप्रधान भारताचे तेच चित्र व वातावरण पाहत होते. ब्रिटिश ज्या परिस्थितीत देश सोडून गेले, तीच परिस्थिती जॉन्सन पाहत होते,” असं म्हणत शिवसेनेनं केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.

“धार्मिक द्वेष, जातीय तणाव उभा करून ‘फोडा-झोडा’ योजनेचे शिल्पकार ब्रिटिश होते. आज त्याच ब्रिटिश नीतीने देश चालला आहे. हे पाहून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना गदगदून आले असेल. धर्माचे राजकारण वेगळे व धर्मांधतेचे राजकारण वेगळे. बॅ. जीना यांनी धर्मापासून सुरू केलेले राजकारण धर्मांधतेपर्यंत पोहोचले. त्यातून निर्माण झालेले पाकिस्तान आजही त्याच डबक्यात गटांगळ्या खात आहे. आज भारताही तेच डबके होताना दिसत आहे. जॉन्सन यांच्यासारखे नेते जागतिक पातळीवर निप्रभ ठरले आहेत. रशियाच्या पुतीनपुढे ‘नाटो’ राष्ट्रांचा निभाव लागला नाही व नाटोच्या भरवशावर पुतीनशी लढू पाहणारे युक्रेन बेचिराख झाले,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“जॉन्सन हे भारतात येण्यापूर्वी स्मशान झालेल्या युक्रेनमध्ये फिरून आले व आता गुजरात, दिल्लीत पोहोचले. येथेही ते जाळपोळ व तोडफोडच पाहत आहेत. प्रश्न इतकाच आहे की, भारतातील धार्मिक दंगलींचे ‘ब्रॅण्डिंग’ करण्यासाठी जॉन्सन यांना ‘जेसीबी’वर चढायची गरज नव्हती. त्यांच्या सल्लागार मंडळास हे समजायला हवे होते. पंतप्रधान मोदी व जॉन्सन यांच्यात जागतिक तणावावर चर्चा झालीच असेल, पण भारताही त्याच तणावाचा शिकार होताना दिसत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“भाजपाचे राजकारण कसे चालवले जाते ते पहा. पंजाब केजरीवाल यांच्या ‘आप’ने जिंकले आहे. राजधानी दिल्लीतही ‘आप’चेच राज्य आहे. पंजाबात तर भाजपा भुईसपाट झाली. त्यामुळे गुरू तेगबहादूर यांच्या ४०० व्या जयंतीचे निमित्त साधण्यासाठी पंतप्रधानांनी लाल किल्ल्याचे प्रयोजन केले. त्या सोहळय़ास पंजाबचे मुख्यमंत्री व शिखांचे नेते आमंत्रित नव्हते. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून सांगतात, ‘‘औरंगजेबासारख्या जुलमी विचारांपुढे गुरू तेगबहादूर अत्यंत खंबीरपणे उभे राहिले. औरंगजेब आणि त्याच्यासारख्या जुलमी लोकांनी कत्तली केल्या. त्याला लाल किल्ला साक्षीदार आहे.’’ पंतप्रधान मोदी यांनी सत्यच सांगितले. औरंगजेबाच्या अत्याचाराचे सगळ्यात जास्त घाव पंजाब आणि महाराष्ट्रानेच सोसले. मऱ्हाटे व शीख समाज या मोगली आक्रमणाविरुद्ध लढत राहिला. या समाजाने त्याग व बलिदान दिले. बाकी प्रदेश तेव्हा सूतकताईत दंग होते. जुलमी औरंगजेबाविरोधात मऱ्हाट्यांची हिंदुत्ववादी तलवार पंचवीस वर्षे लढत राहिली. शेवटी त्या औरंग्याला महाराष्ट्रातच मरणाला सामोरे जावे लागले,” असं अग्रलेखात म्हटलंय.

“महाराष्ट्र, पंजाब, बंगालसारख्या राज्यांनी आक्रमकांपुढे कधीच शरणागती पत्करली नाही. जागतिक इतिहासात याची नोंद आहे. त्यासाठी खोटा इतिहास निर्माण करण्याची गरज नाही. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी संबोधन केले. बोरिस जॉन्सन यांनी सूतकताई केली, ते जेसीबीवर चढले. दिल्लीत येऊन जॉन्सन म्हणाले, ‘‘भारत हा एक अजब व चमत्कारिक देश आहे.’’ जॉन्सन खरेच बोलले. १९४७ ते २०२२ या काळात काहीच बदललेले नाही, जे बदलले गेले त्यावर जेसीबी आणि बुलडोझर फिरले. हे अजबच म्हणावे लागेल,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.